बँकांनी पीक कर्ज द्यावे, अन्यथा पोलीस तक्रार !
सोलापूर, दि. १ जुलै २०२०
सध्या पेरणीचा हंगाम सुरु असून यासाठी प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक बँकेस पीक कर्जाचे उद्दिष्ट ठरवून देण्यात आले आहे. पण बँका पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करीत असल्याचे स्पष्ट होत आहे. शासकीय नियमानुसार पीक कर्ज वितरण करण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँकांविरुध्द पोलीस तक्रार करावी, अशा सूचना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिल्या आहेत. त्यानुसार तक्रार केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिला आहे.
जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे यांनी सांगितले की, खरीप हंगाम सुरु होऊन सुमारे एक महिना झाला आहे. सोलापूर जिल्ह्यास एकूण 1438.52 कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. 30 जूनअखेर 648.88 कोटी पीक कर्जाचे वाटप झाले आहे. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी 30 जूनअखेर पीक कर्ज वाटपात वाढ झाली आहे. आतापर्यंत एकूण उद्दिष्टाच्या 45 टक्केच वाटप झाले आहे. हे वाटप जास्तीत जास्त व्हावे, यासाठी बँकाकडे पाठपुरावा केला जात आहे. याबाबत उद्दिष्ट साध्य न करणाऱ्या बँकांना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सूचना दिल्या आहेत. यामध्ये बँक ऑफ महाराष्ट्रसह काही बँकांचा समावेश आहे, अशी माहिती भोळे यांनी दिली.
आंध्रा बँक, सिंडीकेट बँक, कर्नाटक बँक, कोटक महिंद्रा बँक या चार बँकांनी अद्याप एकही रुपयांचे पीक कर्ज वितरित केलेले नाही. त्याचवेळी आयसीआयसीआय बँकेने 166.26 टक्के तर एचडीएफसी बँकेने 11.46 टक्के उद्दिष्ट साध्य केले आहे, असेही भोळे यांनी सांगितले.
