शिक्षकांच्या 6000 जागा भरण्यास परवानगी!
शिक्षकांच्या सहा हजार जागा भरणार.
शिक्षक भरतीवरील बंदी उठवली..
मुंबई, दि. 9 डिसेंबर:
शिक्षक भरतीसंदर्भात गूड न्यूज आहे. तीन वर्षांपासून रखडलेली शिक्षक भरती अखेर मार्गी लागली आहे. कोरोना संकटामुळे सर्व नोकर भरतीवर बंदी घालण्यात आली होती पण शिक्षक भरतीवरील बंदी उठवण्याचा निर्णय आता महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे.
आठवडाभरात पवित्र पोर्टल पुन्हा भरती सुरु करण्यात येणार असून सहा हजार जागांवरील भरती प्रक्रिया सुरु होईल. पहिल्या टप्प्यात कोरोनापूर्वी सहा हजार जागा भरल्या होत्या. २०१७ पासून भरती प्रक्रिया सुरु होती. ती लवकर पूर्ण झाली नाही, तर अनेक उमेदवार वयोमर्यादा ओलांडण्याच्या सीमेवर आहेत. त्यामुळे नव्या भरती प्रक्रियेकडे त्यांचे डोळे लागून राहिले आहेत.
मे महिन्यात राज्याच्या वित्त विभागाने सर्व प्रकारच्या सरकारी नोकरभरतीस कोरोना संसर्ग साथीचे कारण देत स्थगिती दिली होती. ३ डिसेंबर रोजी एका बैठकीत वित्तमंत्री अजित पवार यांनी शिक्षण सेवकांची ६ हजार पदे भरण्यास मान्यता दिली आहे. त्यानंतर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शिक्षण आयुक्तांना ७ डिसेंबर रोजी एक पत्र पाठवले असून शिक्षक पद भरतीचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या.
शिक्षण सेवकांची ३ वर्षांसाठी नियुक्ती असून प्राथमिकच्या सेवकांना मासिक ६ तर माध्यमिकच्या शिक्षण सेवकांना मासिक ८ हजार ठोक वेतन दिले जाते. राज्यात सन २००० मध्ये तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारने शिक्षण सेवक ही पद्धत आणली.
राज्यातील जिल्हा परिषद व खासगी अनुदानित शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात शिक्षकांची रिक्त पदे असून गणित व विज्ञान शिक्षकांचा मोठा तुटवडा आहे. तो आता दूर होईल, असे शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या .
