अर्णब गोस्वामींना सुप्रीम कोर्टाचा झटका!
अर्णब गोस्वामींना सुप्रीम कोर्टाचा झटका..
एफआयआर रद्द करण्यास कोर्टाचा नकार..
नवी दिल्ली, दि. ७ डिसेंबर:
पत्रकार अर्णब गोस्वामी यांना सुप्रीम कोर्टाने आज झटका दिला आहे. रिपब्लिक टीव्हीविरोधातील सर्व एफआयआर रद्द करावेत आणि तपास सीबीआयकडे द्यावा अशी त्यांनी याचिका केली होती परंतु ही मागणी अनैसर्गिक असल्याचे सांगून न्यायालयाने सुनावणी करण्यास नकार देत याचिका फेटाळून लावली.
न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांच्या खंठपीठासमोर ही याचिका सुनावणीसाठी आली होती. रिपब्लिक टीव्ही विरोधात दाखल करण्यात आलेले गुन्हे रद्द करण्याची मागणी फेटाळून लावली. त्याचबरोबर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याच्या मागणीलाही न्यायालयाने नकार दिला. याप्रकरणी न्यायालयाने याचिकाकर्त्यांना स्थानिक न्यायालयात जाण्यास मूभा दिली आहे.
अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अर्णब गोस्वामी यांना मुंबईतून अटक करण्यात आली होती. न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर गोस्वामी यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. पण, हायकोर्टाने जामीन देण्यास नकार दिल्याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. 11 नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने गोस्वामी यांना जामीन मंजूर केला होता. आता रायगड पोलिसांनी अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी आरोपपत्र दाखल केल्याने गोस्वामींच्या अडचणीत वाढ झाली आहे.
