ठाणेकरांचे मेट्रोचे स्वप्न साकार…
ठाणेकरांचे मेट्रोचे स्वप्न साकार…
ठाणे, दि. २३ सप्टेंबर २५ ;
वडाळा ते गायमुख दरम्यान तयार होत असलेल्या मेट्रो – ४ तसेच गायमुख ते विजय गार्डन या मेट्रो – ४ अ मार्गावरील मेट्रोची ट्रायल रन घेण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्यासह या मार्गावर प्रवास करून ही ट्रायल रन यशस्वीपणे पूर्ण केली. येत्या काही दिवसात या मार्गावर मेट्रो सुरू होईल व नागरिकांना वाहतूक कोंडीतून काही अंशी दिलासा मिळेल.

ठाणे शहरात मेट्रोला मंजुरी देणे व्यवहार्य होणार नाही असे काँग्रेसच्या कालखंडात आम्हाला सांगण्यात आले होते. मात्र मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस येताच ठाण्यात मेट्रोच्या कामाची मुहूर्तमेढ रोवली गेली आणि त्यांच्याच मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात पहिली ट्रायल रन देखील पार पडणे हे अभिमानास्पद आहे. आज ठाण्यात मेट्रो धावत असल्याचे पाहून आनंद आणि समाधान वाटत असल्याचे मत शिंदे यांनी याप्रसंगी व्यक्त केले.
आता वडाळा ते कासारवडवली – गायमुख आणि वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असा ५८ किलोमीटर लांबीचा हा मेट्रो मार्ग पुढील दीड वर्षात पूर्णपणे कार्यरत झाल्यावर स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळेल. तसेच हा मेट्रो मार्ग पुढे गायमुख ते मीरा भाईंदर या मेट्रो – १० मार्गाला जोडला जाणार असून भविष्यात मुंबई शहरात मेट्रोचा हा लूप तयार होणार आहे. त्यामुळे नागरिकांचा प्रवास गतिमान होणार असून वाहतूक कोंडीतून कायमची मुक्तता होणार आहे.
यावेळी खासदार नरेश म्हस्के, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आमदार निरंजन डावखरे, माजी आमदार रवींद्र फाटक, एमएमआरडीए आयुक्त संजय मुखर्जी, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव नवीन सोना, भाजप जिल्हा अध्यक्ष ॲड.संदीप लेले तसेच महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
