आमदार अमीत साटम मुंबई भाजप अध्यक्ष…

0
FB_IMG_1756132560671

आमदार अमीत साटम मुंबई भाजप अध्यक्ष…

मुंबई, दि. २५ ऑगस्ट:

बीएमसी निवडणुकीपूर्वी अंधेरी (पश्चिम) येथील भाजप आमदार अमीत साटम यांची मुंबई भाजपचे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबईसाठी पक्षाचे व्हिजन पूर्ण करण्यासाठी वचनबद्ध असल्याचे आमदार अमीत साटम यांनी सांगितले.

आमदार साटम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणयांचे त्यांच्यावर विश्वास दाखवल्याबद्दल आणि त्यांना इतकी महत्त्वाची जबाबदारी सोपवल्याबद्दल मनापासून आभार मानले.

आपल्या प्राधान्यक्रमांविषयी बोलताना, आमदार साटम म्हणाले की, पायाभूत सुविधा, वाहतूक व्यवस्था आणि गृहनिर्माणाबरोबरच, शहराची ओळख बदलण्याच्या मोठ्या प्रमाणात होणाऱ्या प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांच्या सुरक्षिततेलाही तितकेच महत्त्व दिले जाईल. मुंबईकरांची सुरक्षा आणि सुरक्षितता ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. मुंबईचा विकास होत असताना, आमचे लक्ष नागरिकांचे कल्याण आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यावर असेल. आम्ही बीएमसीवर महायुतीचा भगवा झेंडा फडकवण्यासाठी आणि बीएमसीमध्ये महायुतीचा महापौर बसवण्यासाठी काम करू, असे आमदार अमीत साटम यांनी सांगितले.

आमदार साटम यांनी पुढे सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली २०१४ पासून झालेल्या प्रमुख पायाभूत सुविधा एका वेगळ्या उंचीवर नेवून ठेवल्याचे सांगितले. यामध्ये कोस्टल रोड, अटल सेतू, मेट्रो प्रकल्प, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, सीसीटीव्ही देखरेख आणि २०११ पर्यंत झोपडपट्टीवासीयांना घरे उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने तसेच अल्प कमी आणि मध्यम उत्पन्न गटासाठी घरे देण्यासाठी गृहनिर्माण सुधारणांचा समावेश आहे. शहराच्या सर्वांगीण विकासासह, देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मुंबई परिवर्तनाच्या मार्गावर आहे अणि ते पुढे नेण्याचे काम आम्ही करू, असे साटम म्हणाले.

१९९७ ते २०२२ पर्यंत बीएमसीमध्ये झालेल्या देशातील सर्वाधिक ३ लाख कोटी रुपयांच्या भ्रष्टाचारावरही साटम यांनी कठोर टीका केली. बीएमसीला या भ्रष्टाचारापासून मुक्त करण्यासाठी आणि नागरी प्रशासनात पारदर्शकता आणि जबाबदारी सुनिश्चित करण्यासाठी भाजप सर्वतोपरी प्रयत्न करेल. पंतप्रधान मोदींच्या दृष्टिकोनाशी सुसंगत आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील विकासाभिमुख, भ्रष्टाचारमुक्त प्रशासनासाठी भाजप कार्यकर्ते प्रत्येक मुंबईकरांपर्यंत दारावरती पोहोचून त्यांचे आशीर्वाद घेतील, असेही आमदार अमीत साटम म्हणाले…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *