काँग्रेसशासित राज्यात पर्यायी कृषी कायदे!
नवी दिल्ली, दि. 29 सप्टेंबर:
केंद्रातील भाजपा सरकारने आणलेल्या कृषी कायद्याला देशभरातून तीव्र असंतोष असून शेतकरी रस्त्यावर उतरून संघर्ष करत आहे. काँग्रेस पक्षानेही या कायद्याला काळा कायदा म्हणत आंदोलन छेडले आहे. मोदी सरकारचा हा कायदा शेती व शेतक-यांना उद्ध्वस्त करणारा असून तो रद्द करावा अशी काँग्रेसची मागणी आहे.
कृषी कायद्याविरोधात आपला लढा आणखी तीव्र करत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आता काँग्रेस शासित राज्यांना केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात पर्यायी कायदे करण्याचे निर्देश दिले आहेत. राज्यांनी घटनेच्या कलम २५४ (२)नुसार कायदा करण्याच्या शक्यता पडताळून पहावी. या कलमानुसार राज्यांना केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधी कायदा करण्याचे अधिकार प्राप्त होतात, असे सोनिया गांधी यांनी म्हटले आहे.
मोदी सरकारविरूद्ध काँग्रेसशासित राज्ये असा नवा संघर्ष यामुळे निर्माण होण्याची आहे. महाराष्ट्रात काँग्रेस सरकारमध्ये असून, काँग्रेस व राष्ट्रवादीने कायदे राज्यात लागू होऊ देणार नसल्याचे आधीचे स्पष्ट केले आहे.
