RPI ची देशभर ‘भारत जिंदाबाद’ यात्रा.
RPI ची देशभर ‘भारत जिंदाबाद’ यात्रा.
मुंबई, दि. २१ मे २५ ;
प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी पाकिस्तानला आणि दहशतवाद्यांना धडा शिकवला याबद्दल प्रधानमंत्री मोदींचे अभिनंदन करण्यासाठी आणि भारतीय सैन्याने हाती घेतलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल रिपब्लिकन पक्षातर्फे देशभर भारत जिंदाबाद यात्रा काढण्यात येणार असल्याची घोषणा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मुंबईत प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली.
पत्रकार परिषदेत रामदास आठवले म्हणाले, जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे निरपराध भारतीय पर्यटकांवर दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला करून 28 जणांची क्रूर हत्या केली.या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर करून पाकव्याप्त काश्मीर मधील दहशतवाद्यांची ठिकाणे उध्वस्त करून 100 पेक्षा जास्त दहशतवादी ठार केले. भारतीय सैन्याने अतुलनीय शौर्य दाखवून देशाचे संरक्षण करून पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशन सिंदूर यशस्वी करून आपले खंबीर नेतृत्व सिद्ध केले. भारतीय सैन्याचा आम्हाला अभिमान आहे.भारताचे वायुदल नौदल आणि भूदल यांनी उत्कृष्ट कामगिरी अतुलनीय शौर्य दाखविले आहे. भारतीय सैन्याचा आम्हाला अभिमान असल्याचे प्रतीक म्हणून भारत जिंदाबाद यात्रा रिपब्लिकन पक्ष देशभर काढणार आहे. 22 मे ते 6 जून पर्यंत देशभरात सर्व राज्यांत महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात आणि तालुक्यात रिपब्लिकन पक्ष भारत जिंदाबाद यात्रा हाती तिरंगा ध्वज घेऊन काढण्यात येणार आहे. सर्व रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी ही भारत जिंदाबाद यात्रा आप आपल्या भागात यशस्वी करावी, असे आवाहन रामदास आठवले यांनी केले आहे.
