नरेंद्र मोदी व भाजपाने SC/ST/OBC समाजाची माफी मागावी:
मुंबई, दि. १ ऑगस्ट :
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे देशातील बहुजन समाजाच्या न्याय हक्कासाठी आवाज उठवत आहेत. त्यांनी जातनिहाय जनगणना करण्याची मागणी लावून धरली आहे म्हणूनच चिडून भाजपाच्या खासदाराने लोकसभेत राहुल गांधी यांची जात विचारली. भाजपाने जात विचारून फक्त राहुल गांधी यांचाच अपमान केला नसून एससी, एसटी, भटक्या विमुक्त, आदिवासी, मागास तसेच ओबीसी समाजाचा भाजपाने अपमान केला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व भारतीय जनता पक्षाने या समाजाची जाहीर माफी मागावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
टिळक भवन येथे पत्रकारांनी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, राहुल गांधींना जात विचारल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये जसा संताप आहे तसाच बहुजन समाजामध्येही भाजपाविरोधात तीव्र संताप आहे. काँग्रेस कार्याकर्त्यांनी आज रस्त्यावर उतरून राज्यभर आंदोलन केले व भाजपाच्या या मनुवादी वृत्तीचा जाहीर निषेध केला. जात विचारणाऱ्या भाजपा खासदार अनुराग ठाकूर यांची माफी नको, असे राहुल गांधी म्हणाले आहेत. कितीही अपमान केला, शिव्या दिली तरी बहुजन समाजाच्या न्याय हक्कासाठी लढत राहणार व जातनिहाय जनगणना करणार यावर राहुल गांधी ठाम आहेत. अनुराग ठाकूरच्या विधानाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समर्थन केले हे अत्यंत गंभीर आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आज जिल्हा मुख्यालयी आंदोलन करत भाजपा व खासदार अनुराग ठाकूर यांचा निषेध केला.
