पवारांच्या उपस्थितीत शशिकांत शिंदेंचा अर्ज दाखल.
सातारा, दि.१६ एप्रिल :
साताऱ्यातील मायबाप जनतेने ‘तुतारी’ हाती घेतली असून ही अलोट गर्दी आणि सह्याद्रीच्या योध्याला मिळणारा हा प्रतिसाद म्हणजे विजयाची साक्ष आहे असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार म्हणाले.
सातारा लोकसभा मतदारसंघात आमचे नाणे खणखणीत आहे.सातारा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. यानंतर शरद पवार यांनी संवाद साधला. सातारा लोकसभा मतदारसंघातील मतदार हे कायम आमच्या पाठीशी उभे राहिले आहेत. येथील मतदार हे पुरोगामी विचारांचे असल्याचा दावा शरद पवार यांनी केला आहे. त्यामुळे शशिकांत शिंदे हे विजयी होतील, असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.
शरद पवार म्हणाले की, साताऱ्याचं वैशिष्ट्य आहे की, सातारा नेहमीच पुरोगामी विचारांना पाठिंबा देणार आहे. स्वातंत्र्यांनंतर अनेक नाव घेता येतील. कर्तृत्ववान लोकांची फळी होऊन गेली आहे. यशवंतराव चव्हाण, आनंदराव चव्हाण आणि यशवंतराव मोहित अशी कर्तुत्ववान लोकांची एक प्रचंड कोण दिली आहे. या सर्वांच्या विचाराचा पडगा आजही या जिल्ह्यातील लोकांवर आहे.
आज देशांमध्ये जे घडत आहे. त्याला पर्याय देण्याच्या दृष्टिकोनातून पर्याय देण्याकरिता आम्ही इंडिया आघाडीच्या मार्फत देण्याचा प्रयत्न आमचा सुरू आहे. याला प्रतिसाद देण्याकरिता सातारा जिल्हा अग्रस्थानी आहे. आज उमेदवारी दाखल करण्याचा कार्यक्रम व्यतिरिक्त दुसरा कोणताही कार्यक्रम नव्हता. उमेदवारी दाखल करण्याकरिता निघालेल्या रॅलीमध्ये हजारोच्या संख्येने लोकांनी सहभाग घेतला होता. यातूनच स्पष्ट होत आहे की लोकांना परिवर्तन हवं आहे याची सुरुवात साताऱ्यातून होणार आहे असे शरद पवार म्हणाले.
महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शरद पवार साताऱ्यात दाखल झाले होते. या रॅलीचे स्वरूप भव्यदिव्य असावं यासाठी खास रथाची सोय करण्यात आलेली होती. महाविकास आघाडीचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने या रॅलीत सहभागी झाले होते.
