सरकारने जनतेच्या तोंडाला पानं पुसली..
सरकारने जनतेच्या तोंडाला पानं पुसली..
नागपूर , दि. २० डिसेंबर –
हिवाळी अधिवेशनात शेतकरी, कष्टकरी व जनतेच्या हिताच्या कोणत्याही घोषणा न करता सरकारने विदर्भ तसेच राज्यातील जनतेच्या तोंडाला पानं पुसण्याचे काम केलं, अशा शब्दांत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी अधिवेशनाच्या कामकाजावर ताशेरे ओढले.
राज्यातील कायदा सुव्यवस्था, मंत्र्यांचे भ्रष्टाचार, अवकाळी पाऊस, नुकसान भरपाई, जनता, शेतकरी व विदर्भाच्या प्रश्नांवर सरकारला आम्ही या अधिवेशनात जाब विचारल्याची माहिती विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी हिवाळी अधिवेशनाची सांगता झाल्यावर पत्रकार परिषदेत दिली.
सरकारने विदर्भा बाबतीत फक्त या अधिवेशनामध्ये घोषणा केल्या असून ५ वर्षांपासून येथील मुख्यमंत्री होते. सध्याच्या सरकार मध्ये हे उपमुख्यमंत्री असूनही विदर्भा ला ठोस असे काहीही मिळाले नाही. सत्तेत असूनही या सरकारने काय केलं, असा टोला विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजपला लगावला. कायदा सुव्यवस्था विषयी अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला मात्र गृहमंत्री यांनी फक्त या प्रश्नी आकडेवारी सांगितली.
या सरकारला जनतेच्या हिताचे कोणतेही देणंघेणं नाही. या सरकारमधील काही मंत्री जाती जातीत भांडण लावण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजपकडून धनगर समाजासाठी घोषणा करण्यात आल्या मात्र प्रत्यक्षात त्याची कोणतीही अंमलबजावणी केली गेली नाही. सरकारच्या या दुटप्पी भूमिकेचा विरोधक म्हणून आम्ही सभागृह बाहेर व आत वेळोवेळी निषेध नोंदवला असल्याचे दानवे म्हणाले. या अधिवेशनात विरोधक म्हणून शेतकरी, कष्टकरी, माता भगिनी, बेरोजगारीचे प्रश्न तडीस लावण्याचा प्रयत्न केल्याचे दानवे म्हणाले.
नगरविकास विभागाने मुंबई महापालिकेप्रमाणे पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर महानगरपालिकेची चौकशी करावी, अशी मागणी दानवे यांनी केली. सुधाकर बुडगूजर यांच्याप्रमाणे इकबाल मिरची चे संबंध असल्याप्रकरणी प्रफुल पटेल तसेच भाजपचे मंत्री गिरीश महाजन व इतरांचीही दाऊदच्या नातेवाईकाच्या लग्नात हजेरी लावल्याबाबत चौकशी करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली.
शेतकऱ्यांच्या हिताची एकही घोषणा सरकारने केली नाही. ४० दुष्काळग्रस्त तालुके जाहीर करून सरकारने जबाबदारीतून पळ काढण्याचा प्रयत्न केला. प्रत्यक्षात आणेवारी नुसार ८८ पेक्षा अधिक तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला पाहिजे , असे दानवे म्हणाले. मराठा समाज संवेदनशील झालेला आहे, त्यामुळे सरकारने याकडे बारकाईने लक्ष देण्याची गरज असल्याचे दानवे म्हणाले.
सरकार हे कर्जबाजारी झालं आहे. त्यामुळे निधी अभावी घोषणा करणे सरकारने थांबवल्या असून राज्याची आर्थिक स्थिती बिकट असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे.
