दारुबंदी करा अशी मागणी अनेकदा पुढे येत असते त्यासाठी आंदोलन, मोर्चेही काढले जातात पण ठाकरे सरकारमधील एका मंत्र्यानेच चक्क दारुबंदी उठवा अशी मागणी केली आहे. अशी मागणी करणारे आहेत मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार. गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यात सध्या असलेली दारु बंदी उठवा अशी मागणी त्यांनी केली आहे.
सामाजिक कार्यकर्ते, काही समाजसेवी संघटना, महिला यांनी दारुबंदी करण्यासाठी आंदोलने केली होती, त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यात पाच वर्षांपूर्वी दारूबंदी लागू करण्यात आली. दारूबंदी लागू झाल्यानंतर या जिल्ह्यात अवैध व बनावट दारू विक्रीचा काळाबाजार वाढला आहे. दारुबंदी फक्त कागदावरच राहिली आणि राजरोसपणे दुप्पट-तिपप्ट किमतीला दारू विकली जाते. यातून गुन्हेगारीही वाढली, पोलीसांवर हल्ले करण्याचा घटना घडल्या. यातूनच एका पोलीस अधिकाऱ्याची हत्याही झाली. अवैध दारू विक्रीमध्ये तरुण मुले, कॉलेजचे विद्यार्थीही सहभागी झाल्याने दिसून आले.
गडचिरोली व चंद्रपूरमध्ये दारुबंदी असूनही दिवसरात्र खुलेआम दारू विक्रीचा काळाबाजार सुरु असताना दुसरीकडे राज्याचा करोडो रुपयांचा महसूलही बुडत आहे. हे सर्व लक्षात घेऊन पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रशासनाच्या माध्यमातून दारूबंदी सुरू ठेवावी की उठवावी यावर लोकांचे मत मागितले होते. 80 टक्के लोकांनी दारू सुरू करावी असे मत व्यक्त केले.
चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील दारुच्या अवैध धंद्याला आळा घालण्यासाठी दारु बंदीच उठवा अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी उत्पादन शुल्कमंत्री व गृहमंत्री यांच्याकडे केली असून यावर चर्चा करण्यासाठी तातडीने बैठक घ्यावी अशी मागणीही केली आहे.