संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना शेवटी संधी
संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना शेवटी संधी…
मुंबई, दि. २६ मार्च:
मागील पाच महिन्यांपासून संपावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना शेवटची संधी देण्यात आली आहे. संपावरील कर्मचाऱ्यांनी ३१ मार्चपर्यंत कामावर यावे, त्यानंतर जे कर्मचारी कामावर येणार नाहीत त्यांच्याबाबत कठोर कारवाई करण्याची भूमिका घेतली जाईल, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला.
पुण्यात एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना अजित पवार म्हणाले की, एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या असून पगारवाढही केली गेली आहे. वर्षाला ७५० कोटींचा बोजा सरकारवर पडणार आहे, पगार वेळेत होणार आहेत. त्याची जबाबदारी राज्य सरकारने घेतली आहे. तरीही कर्मचारी अजून कामावर परतलेले नाहीत.
एसटीचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण व्हावे ही कामगारांची प्रमुख मागणी आहे परंतु न्यायालयाच्या आदेशाने नेमण्यात आलेल्या समितीने विलिनीकरणाची मागणी व्यवहार्य नसल्याचे सांगत मागणी फेटाळली आहे. राज्य सरकारनेही त्यांची भूमिका जाहीर केली आहे. राज्य सरकारने कारवाईचा बडगा उगारल्याने काही कर्मचारी कामावर परतले असले तरी अजून एसटी सेवा रुळावर आलेली नाही.
