काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचाही ‘फोन टॅप’ !

0
20210422_163724

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचाही ‘फोन टॅप’ !

मुंबई, दि. १४ मे :

देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात २०१६-१७ साली फोन टॅपिंग करण्यात आले होते त्यात माझाही फोन टॅप करण्यात आला होता अशी माहिती आपल्याला खाजगी टीव्ही चॅनलकडून मिळाली असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला असून यात अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्याच्या नावाखाली राजकीय नेत्यांचे फोन टॅपिंग करण्यात आले. या प्रकरणी नंबर माझा व अमजद खान असे खोटे नाव वापरण्यात आले होते. या फोन टॅपिंगशी संबंधीत सर्वांची महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

यासंदर्भात बोलताना पटोले म्हणाले की, फडणवीस सरकारच्या काळात माझ्यासह राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष तसेच शिवसेनेतील काही महत्वाचे नेते आणि काही आयएएस, आयपीएस अधिकारी यांचेही फोन टॅपिंग केले जात होते. माझा संबंध अंमली पदार्थांच्या तस्करीशी जोडण्याचा प्रयत्न करुन हा निंदनीय व अश्लाष्य प्रकार करण्यात आला आहे. फोन टॅपिंग करताना नावे व पत्ते खोटी तसेच बनावट दाखवून फोन टॅप करण्यात आले. हे फोन टॅपिंग कोणी केले आणि त्यांना परवानगी कोणी दिली ? फोन टॅपिंग करण्याचा उद्देश काय होता ? फोन टॅप करुन एखाद्या व्यक्तीवर पाळत ठेवणे हा गुन्हा आहे तसेच हा प्रकार व्यक्ती स्वातंत्र्याचा भंग करणारे असून राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार हे खपवून घेणार नाही. जे कोणी या फोन टॅपिंगशी संबंधीत होते त्यांची चौकशी करून कठोर कारवाई करावी, असेही पटोले म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *