भाजपाचे राज्य म्हणजे ‘गाढवांचा गोंधळ आणि लाथांचा सुकाळ’!
भाजपाचे राज्य म्हणजे ‘गाढवांचा गोंधळ आणि लाथांचा सुकाळ’!
काँग्रेसच्या सचिन सावंतांचे भाजपाच्या आशिष शेलारांना प्रत्युत्तर.
मुंबई, दि. ३ मे :
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अदर पुनावाला यांच्या तक्रारीवरून सवाल करत लसीकरणाबाबत मोदी सरकारच्या नियोजनशून्यतेवर बोट ठेवले. देशात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना केंद्र सरकारने रेमडेसिवीर व लसींची निर्यात का केली, हा प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नांचे उत्तर न देता भाजपा आमदार आशिष शेलार यांनी भाजपाच्या मुजोरपणाची परंपरा कायम राखली आहे. भाजपाचे राज्य म्हणजे गाढवांचा गोंधळ आणि लाथांचा सुकाळ अशी परिस्थिती आहे, असे जोरदार प्रत्युतर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी शेलार यांना दिले आहे.
भाजपा व शेलार यांच्या समाचार घेत सावंत पुढे म्हणाले की, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधीजी, मनमोहन सिंहजी व राहुल गांधी यांनी मोदी सरकारच्या चुका दाखवण्याचा,
सल्ला देण्याचा प्रयत्न केला त्यावर लगेच मोदी सरकारच्या मंत्र्यांनी मुजोरपणे टीका केली. काँग्रेस नेत्यांनी दिलेला सल्ला वेळीच ऐकला असता तर आज देश आर्थिकदृष्ट्या उध्वस्त झाला नसता, लाखो संसार उघड्यावर पडले नसते. अनेकांना आपल्या प्रियजनांना मुकावे लागले नसते. निष्पाप जीव बळी गेले नसते. स्मशानात रांगा लागल्या नसत्या. देशाची जगात नाचक्की झाली नसती. याला केवळ भाजपाची मुजोरी, अकार्यक्षमता व अज्ञान जबाबदार आहे.
भाजपाला जो यांना आरसा दाखवतो त्याच्यावरच गलिच्छ भाषेत टीका केली जाते. भाजपा हा टवाळखोरांचा पक्ष आहे हे स्पष्ट आहेच. त्यामुळे कालाकांडी वगैरे भाषाही त्यांनाच शोभू जाणे. भाजपा नेत्यांनी कितीही टवाळखोरी केली तरी काँग्रेस जनतेचा आवाज उचलत राहील, असेही सावंत यांनी बजावले.
