नवी मुंबईचा पुढचा महापौर महाविकास आघाडीचा!
नवी मुंबईचा पुढचा महापौर महाविकास आघाडीचा !
नवी मुंबई, दि. १९ फेब्रुवारी :
पवारसाहेबांना राजकारणात ५५ वर्षे झाली. त्यातली २५ वर्ष सत्तेत गेली तर २५ वर्ष विरोधात गेली. या ५५ वर्षात महाराष्ट्रातील जनतेने पवारसाहेबांना कधी अंतर दिले नाही ही गोष्ट राष्ट्रवादी पक्ष हे कुटुंब म्हणून लक्षात ठेवले, तसे सगळ्यांनी लक्षात ठेवले पाहिजे, असे सांगतानाच सत्ता येते आणि जाते. सत्ता ही सेवा करण्यासाठी असते ती पदासाठी नसते ना लालदिव्यासाठी असते हे लक्षात ठेवा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी नवीमुंबई येथील कार्यकर्ता मेळाव्यात केले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त नवीमुंबई येथे कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून खासदार सुप्रियाताई सुळे यांनी अभिवादन केले.
नवीमुंबईत सत्ता परिवर्तन एक हजार एक टक्के होणार ही काळ्या दगडावरची रेघ असून पुढचा महापौर हा महाविकास आघाडीचाच होईल असा विश्वास खासदार सुप्रियाताई सुळे यांनी व्यक्त केला.
देवेंद्र फडणवीस म्हणाले होते पवारसाहेबांनी रिटायर्ड व्हावं. छान मार्गदर्शन केले होते. मात्र महाराष्ट्राने पवारसाहेबांना रिटायर्ड करायचं नाही हे ठरवलं होतं त्यामुळे ‘एक देवेंद्र फडणवीस क्या करेगा महाराष्ट्र एक तरफ और देवेंद्र फडणवीस एक तरफ’ असा जोरदार टोला लगावतानाच पवार साहेब म्हटले असते मी आता देवेंद्र फडणवीस बोलत आहेत तर रिटायर्ड होतो परंतु महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात नाही ना तसं असे सुप्रियाताई सुळे यांनी स्पष्ट केले.
पक्षात दीड वर्षांपूर्वी कोण टिकेल, कोण लढेल आणि कोण लढणार नाही अशी परिस्थिती होती. रोज उठून आज कोण पक्षातून गेला याची चिंता असायची आणि कोण पक्ष सोडून गेला नाही की बरं वाटायचं अशी आठवण सांगतानाच ५२ लोक पवारसाहेबांना सोडून गेले. त्यातील एकही आमदार म्हणून निवडून आला नाही हा महाराष्ट्राचा इतिहास आहे असेही सुप्रियाताई सुळे म्हणाल्या.
२०१४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं झालं ते २०१९ मध्ये भाजपचं झालं. त्यातून सेना वाचली. त्यांच्या पटकन लक्षात आले. दाल मे काला है इधरसे निकलो. उध्दवजींनी आपल्यावर विश्वास दाखवला आहे आणि त्यातूनच महाविकास आघाडीची स्थापना झाली. केंद्रसरकार मध्ये सव्वा वर्षात कुठलीही टिका करु शकले नाही कारण ते जेव्हा खाली बोलतात तेव्हा त्यांना पूर्ण ताकदीने महाविकास आघाडी उत्तर महाराष्ट्रात दिले आहे. त्यामुळे प्रत्येक जण महाविकास आघाडीचे मॉडेल देशात यायला हवे अशी अपेक्षा व्यक्त करत असल्याचे खासदार सुप्रियाताई सुळे यांनी सांगितले.
या मेळाव्याला कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, आमदार शशिकांत शिंदे, माजी खासदार आनंद परांजपे, प्रशांत पाटील, अशोक गावडे आदींसह पक्षाचे नेते आणि पदाधिकारी व महिला पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
