औरंगाबादचा महापौर काँग्रेसचा करण्यासाठी कामाला लागा!
औरंगाबादचा महापौर काँग्रेसचा करण्यासाठी कामाला लागा!: बाळासाहेब थोरात.
मतभेद झटकून सर्व ११५ जागा लढवण्याची तयारी करा.
औरंगाबाद, दि. १ जानेवारी :
औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने उतरत असून पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सर्व मतभेद संपवून जोमाने कामाला लागावे. पक्षहित हे सर्वात महत्वाचे आहे. कसल्याही प्रकारची गटबाजी खपवून घेतली जाणार नाही. औरंगाबादचा महापौर काँग्रेसचा होईल यासाठी कामाला लागा, पक्ष सर्वतोपरी मदत करेल, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.
महापालिका निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी थोरात औरंगाबाद येथे आले होते. यावेळी थोरात यांनी औरंगाबाद शहरातील प्रमुख नेते, पदाधिकारी यांच्याशी वैयक्तिक संवाद साधला व सध्याची राजकीय परिस्थिती व निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला. त्यांनी सर्व नेत्यांना एकत्रित बसवून मार्गदर्शनही केले.
यावेळी बोलताना थोरात म्हणाले की, अमित देशमुख सारख्या तरुण व कर्तबगार मंत्र्याकडे औरंगाबादची जबाबदारी दिलेली आहे. प्रत्येक वार्डात काँग्रेसची ताकद वाढवा, लोकांपर्यंत पोहोचा. महानगरपालिकेच्या सर्व ११५ जागा लढवण्यासाठी तयार रहा. महाविकास आघाडी म्हणून पहिले ध्येय हे भाजपाला सत्तेपासून दूर ठेवणे हे आहे. निवडणुकीत आघाडीबाबत योग्य त्यावेळी निर्णय होईल. पण तुमची मते विचारात घेतली जातील. असे असले तरी सर्व जागा लढण्याची तयारी ठेवा आणि औरंगाबादला पुन्हा एकदा काँग्रेसचा गड बनवा.
ते पुढे म्हणाले की, काँग्रेस कमकुवत आहे असा अपप्रचार केला जात असून तो चुकीचा आहे. काँग्रेस पक्षाची ताकद असून त्याचा प्रत्यय नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत दिसून आलेला आहे. नागपूरचा ५५ वर्षांचा भाजपा आरएसएसचा बालेकिल्ला काँग्रेसने मोठ्या मताधिक्याने खेचून आणला, पुण्यातही विजय संपादन गेला. भाजपाचा या निवडणुकीत धुव्वा उडवला. काँग्रेस पक्षावर लोकांचा विश्वास आहे आणि महाविकास आघाडी सरकारच्या एका वर्षाच्या कामकाजावर लोक समाधानी आहेत, लोकांपर्यंत पोहचा विजय निश्चित आहे असा कानमंत्र थोरात यांनी पदाधिकारी यांना दिला .
