राज्यपालांची गणेशोत्सव मंडळांना कौतुकाची थाप!

0
IMG-20201231-WA0034

“मनुष्यरूपी गणेशाची” सेवा केल्याबद्दल राज्यपालांची गणेशोत्सव मंडळांना कौतुकाची थाप.

बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीतर्फे करोना योद्ध्यांचा राजभवन येथे सत्कार.

मुंबई, दि. 31 डिसेंबर 2020

करोना संक्रमणाच्या काळात सर्व जग भयभीत झाले असताना मुंबईतील अनेक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून मनुष्यरुपी गणेशाची सेवा केली.

सुखकर्ता, विघ्नहर्ता गणेश जगात अनेकविध रूपांनी समोर येत असल्यामुळे, करोना बाधित रुग्ण व गरजूंची केलेली सेवा गणेशसेवेपेक्षाही मोठे कार्य आहे. या सेवेकरिता करोना योद्ध्यांना निश्चित दुप्पट पुण्य लाभेल, या शब्दात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज करोना योद्ध्यांना कौतुकाची थाप दिली.

बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीच्या वतीने राजभवन येथे गुरुवारी ५० करोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला, त्यावेळी राज्यपाल बोलत होते. भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांच्या पुढाकाराने झालेल्या या कार्यक्रमाला समन्वय समितीचे अध्यक्ष अँँड. नरेश दहीबावकर यावेळी उपस्थित होते.

आरोग्य सुविधांमध्ये अतिशय प्रगत असलेल्या अनेक देशांमध्ये तेथील लोकसंख्येच्या तुलनेत करोना बाधितांची तसेच करोनाबळींची संख्या जास्त होती. भारतात मात्र हे प्रमाण अतिशय कमी होते. डॉक्टर्स, नर्सेस, पोलीस, स्वयंसेवी संस्था यांसह गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांनी ‘जनता जनार्दनाची सेवा, हीच ईशसेवा आहे‘ या श्रेष्ठ भावनेने कार्य केल्यामुळेच हे शक्य झाले, असे राज्यपालांनी सांगितले.

बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ समन्वय समितीने ‘कोविड कृती दल‘ स्थापन करून गणेश मंडळांच्या ४५० कार्यकर्त्यांमार्फत रक्तदान शिबिरे, योगसाधना, जंतूनाशक फवारणी, मास्क वाटप, स्यानिटायझर्स वाटप, भोजनदान अन्नधान्य वाटप, पोलिसांसाठी चहा – नाश्त्याची सोय यांसारखे उपक्रम राबविल्याबद्दल राज्यपालांनी समितीचे कौतुक केले.

यावेळी भाजपा नेते आमदार आशिष शेलार म्हणाले की, यावर्षी कोरोनामुळे सार्वजनिक गणेशोत्सवाची शंभर वर्षाहून अधिक जूनी अखंड परंपरा खंडित होते की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली होती, त्यावेळी सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने ही परंपरा खंडित होऊ नये म्हणून पुढाकार घेतला. यावेळी गणेशाच्या आगमनामध्ये विघ्न निर्माण होते की काय अशी परिस्थिती होती अशावेळी अडचणींवर मात करीत शासनाचे नियम पाळून अनेक गणेशोत्सव मंडळांनी ही परंपरा कायम राखली. गणेशाचे आगमन, प्राणप्रतिष्ठा, पुजन, विसर्जन हे सारे निर्विघ्नपणे पार पडले.तसेच उत्सवाची परंपरा कायम राखत रक्तदाना सारखे उपक्रम अनेक मंडळांनी राबवले. या कार्यात ज्यांनी काम केले त्यामध्ये जे गणसेवक होते त्या़ंचा हा प्रातिनिधिक सन्मान आहे. त्यासाठी राज्यपालांनी वेळ दिली त्याबद्दल राज्यपालांचे आभार ही आमदार अँड आशिष शेलार यांनी मानले.

समन्वय समितीने सर्व गणेशोत्सव मंडळांना एका छत्राखाली आणून करोनाचे सावट असताना गणेशोत्सवाचे निर्विघ्नपणे आयोजन केले तसेच कार्यकर्त्यांची फौज उभारून करोनारुग्णांना मदत करणे, गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलाव तयार करणे यांसारखे उपक्रम राबविले, असे दहिबावकर यांनी संगितले. समितीचे कार्यकर्ते शिवाजी खैरनार यांनी समितीच्या कोविड कृती दलाच्या कार्याची माहिती दिली.

राज्यपालांच्या हस्ते यावेळी नरेश दहीबावकर, गिरीश वालावलकर, कुंदन आगासकर, मदन कडू, वसंत मुळीक, ओमकार सावंत, निखील गुढेकर, निखील मोरये, शिवाजी खैरनार, अरुणा हळदणकर, जयंत पटेल, प्रथमेश राणे, प्रतीक जाधव, बाळकृष्ण लाड, महादेव नारकर, भूषण मडाव, संतोष सावंत, सुधाकर जयवंत पडवळ, कल्पेश राणे, मुकुंद लेले, सीमा शशिकांत मोईली, पूर्णिमा भोसले, सुरज वालावलकर, रत्नदीप चिंदरकर, प्रदीप पांडे, विपुल जाधव, कुशल कोठारे, प्रथमेश तेंडूलकर, हेमंत कल्याणकर, रितेश सावंत, सिद्धेश खानविलकर, दिनेश देवाडिगा, हर्शल जोशी, मिथिल अंगणे, अनिल यादव, गणेश गुप्ता, भूषण पाटकर, भालचंद्र मांजरेकर, निलेश शिंदे, प्रभाकर परसे, चंद्रकांत पाटील, शशांक चौकीदार, बिपीन कोटारे, संजय शिर्के, अपूर्व निकम, आदित्य नाडकर्णी, अतुल आव्हाड, प्रणय अडव आदींचा सत्कार करण्यात आला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *