आजचे कृषी कायदे आणि ‘त्या’ पत्राचा संबंध नाही!
‘ते’ पत्र थोडं नीट वाचलं असतं तर…..!
आजचे कृषी कायदे आणि ‘त्या’ पत्राचा संबंध नाही.
नवी दिल्ली, दि. ८ डिसेंबर:
कृषी कायद्यामुळे देशभरातून संताप व्यक्त केला जात असून शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमांना घेराव घातल्याने मोदी सरकार कोंडीत सापडले आहे.शेतकरी आंदोलनामुळे भाजपाविरोधात वातावरण झाले असताना विरोधकांवर निशाणा साधण्याचा भाजपाने प्रयत्न केला. यासाठी भाजपाने युपीए सरकारवेळी कृषीमंत्री असलेले शरद पवार यांच्या पत्राचा हवाला देत, पवार यांनीच कृषी क्षेत्रात बदल सुचवले होते असा दावा केला पण त्यांचा हा दावाही त्यांच्या अंगलट आल्याचे दिसत आहे.
दिल्लीत पत्रकारांशी बोलताना शरद पवार म्हणाले की, ‘ज्यांनी पत्राचा हवाला दिला आहे त्यांनी ते थोडं नीट वाचलं असतं तर त्यांचा वेळ वाचला असता. कायद्यातील सुधारणांसंदर्भात पत्र लिहिलं होतं यामध्ये कोणतंही दुमत नाही. पण आज जे तीन नवे कृषी विधेयक आणले आहेत त्यात याचा उल्लेख दिसत नाही. विषय भरकटवण्यासाठी हे केले जात आहे, याला जास्त महत्व देऊ नका’.
केंद्रीय कायदामंत्री रवीशंकर प्रसाद यांनी दिल्लीत एका पत्रकार परिषदेत पवार यांच्या पत्राच्या हवाला दिला होता. तर राज्यात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या पत्राचा उल्लेख केला होता.
