महात्मा ज्योतीबा फुले स्मृतीदिन…
क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या स्मृतीदिनानिमित्त
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिवादन.
मुंबई, दि. २८ नोव्हेंबर :
सामाजिक समतेचे पुरस्कर्ते, स्त्रीशिक्षणाचे प्रणेते, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले यांच्या स्मृतीदिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना अभिवादन केलं असून, थोर समाजसुधारक महात्मा ज्योतीबा फुले यांचे सत्यशोधक विचार, शेतकरी, बहुजन समाजाबद्दलचं त्यांचं धोरणंच राज्याला व देशाला विकासाच्या वाटेवर पुढे घेऊन जाईल, अशा शब्दात त्यांनी महात्मा फुले यांच्याबद्दल आदर व कृतज्ञता व्यक्त केली.
महात्मा ज्योतीबा फुले यांच्या स्मृतीदिनानिमित्त आदरांजली वाहताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले यांनी बहुजन समाजाला शिक्षणाचं महत्व पटवून सन्मानानं जगण्याची ताकद दिली. स्त्रीयांसाठी शिक्षणाची दारं खुली करुन त्यांना मुख्य प्रवाहात आणलं. अज्ञान, अंधश्रद्धा, अस्पृश्यता, जातीभेद, धर्मव्यवस्थेच्या गुलामगिरीतून समाजाला बाहेर काढून वैचारिक, सामाजिक क्रांती घडवली. राज्यकर्त्यांनी त्यांची धोरणं शेतकरी व बहुजन समाजाला केंद्रस्थानी ठेवून आखली पाहिजेत, हा विचार दिला. महात्मा ज्योतीबा फुले यांनी दिलेला विचारांनी व दाखवलेल्या मार्गाने चालण्याचा आपण निर्धार करुया, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले यांना आदरांजली वाहून अभिवादन केलं आहे.
