…. तर मविआ लोकसभेच्या ३८ आणि विधानसभेच्या १८० जागा जिंकेल !
…. तर मविआ लोकसभेच्या ३८ आणि विधानसभेच्या १८० जागा जिंकेल !
मुंबई, दि. १५ मार्च;
मविआचे सरकार चांगले काम करत असताना ते सरकार पाडले. पण आज राज्यातील परिस्थिती मविआच्या बाजूने आहे. विधान परिषदेच्या निवडणुका मविआने जिंकल्या, कसबा पोटनिवडणुकही मोठा विजय मिळवलेला आहे. मी राज्याचा दौरा करत असताना अनेकदा पाहिले की ग्रामीण भागात भाजपा कुठेही नाही. ग्रामीण भाग हा भाजपाच्या अजेंड्यात नाहीच आता ते प्रयत्न करत आहेत. पण मविआने एकत्र निवडणुका लढवल्या तर लोकसभेला ३८ जागा जिंकू शकतो ही परिस्थिती आहे तसेच विधानसभेला १८० जागा जिंकू शकतो, असा विश्वास माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.

महाविकास आघाडीची संयक्त बैठक यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पार पडली. या बैठकीला शिवसेना पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी मंत्री छगन भुजबळ, शेकापचे नेते जयंत पाटील, एकनाथ खडसे, अनिल देशमुख, सुनिल केदार, विजय वडेट्टीवार, सतेज पाटील, आदित्य ठाकरे, प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, सरचिटणीस प्रमोद मोरे, देवानंद पवार यांच्यासह तिन्ही पक्षाचे आमदार, खासदार, जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.
थोरात पुढे म्हणाले की, राज्यातील जनतेला मविआचेच सरकार हवे आहे त्यामुळे तिन्ही पक्षाच्या संघटीत ताकदीवर पुन्हा एकदा महाविकास आघाडीच सत्तेवर येणार हा विश्वास आहे. आघाडीचे सरकार राज्यात सत्तेत येण्यासाठी आदरणीय सोनियाजी गांधी, शरद पवार व उद्धव ठाकरे यांचा महत्वाचा पुढाकार होता. अडीच वर्ष मविआ सरकारने उल्लेखनीय काम केले. सरकार आल्याबरोबर कोरोनाचे संकट आले, खूप अडथळे आले पण त्याकाळातही विकासकामे थांबू दिली नाहीत. कठीण परिस्थितीत उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली केलेल्या कामाचे जगाने कौतुक केले. गंगेत प्रेतं वाहून जात असताना महाराष्ट्राने मात्र अशी वाईट अवस्था येऊ दिली नाही. महाविकास आघाडीचे सरकार आले तेव्हा पहिले काम शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचे केले. त्याआधी भाजपा सरकारने दिलेल्या कर्जमाफीसाठी ६५ रकान्याचा फॉर्म रांगेत उभे राहून भरावा लागत होता पण मविआने कसलाही छळ न करता शेतकऱ्याला कर्जमाफी दिली.
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यावेळी म्हणाले की, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना एकत्र असल्याने महाराष्ट्रात एकोप्याचे वातावरण निर्माण झालेले आहे. मविआचे सरकार असताना उद्धव ठाकरे यांनी सर्व पक्षांना सन्मानाची वागणूक दिली. आम्ही मनापासून एकत्र येऊन सरकार स्थापन केले होते. महाविकास आघाडीचे सरकार जसे होते तसेच स्थानिक पातळीवरही महाविकास आघाडी असली पाहिजे अशी लोकांची इच्छा आहे. तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन देशातील लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी एकत्र आले पाहिजे. सध्या राजकारण ज्या पद्धतीने चालले आहे ते लोकांना पटत नाही. सध्याचे सरकार शत्रुत्वाची भूमिका घेऊन वागत आहे, हे चित्र बदलायचे असेल तर तिन्ही पक्षाने एकत्र आले पाहिजे, यश मिळवायचे असेल तर आपल्याला तालुका, जिल्हा पातळीवर एकत्र आले पाहिजे ते काम आपल्याला करावयाचे आहे.
माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री छगन भुजबळ, शेकापचे नेते आमदार जयंत पाटील, यांनीही बैठकीला संबोधित केले.
