परळी मतदारसंघात चांगली संस्कृती रूजवायची आहे !
अंबाजोगाई, दि. ६ मार्च :
राजकारणात जेव्हा सत्तेला अहंकाराची बाधा होते तेव्हा गर्वाचं घर खाली होतं हे लक्षात घेतलं पाहिजे. केवळ विकासच नाही तर परळी मतदारसंघात मला चांगली संस्कृती रूजवायचीयं. तुमची सेवा करणं माझं कर्तव्यच आहे, त्यासाठी आता तुम्हीच मला दत्तक घ्या, गावोगावी विकासाची लक्ष्मी नांदल्याशिवाय राहणार नाही असं आवाहन भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी केलं.
घाटनांदुर, सोमनवाडी, निरपना व बागझरी येथे जलजीवन मिशन अंतर्गत सुमारे १४ कोटी रूपयाच्या पाणी पुरवठा योजनेच्या कामाचे भूमिपूजन पंकजा मुंडे यांच्या हस्ते शनिवारी झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या.
पंकजा म्हणाल्या, परळी फार गुणी मतदारसंघ होता पण त्याला अवगुणी करण्याची सुपारी काहींनी घेतलीय. मी आमदार असताना गावोगावच्या विकासाला सुरवात केली ती आजही सुरू आहे. आपण लोकनेते मुंडेसारखा नेता देशाला दिला, त्यांचेवर जीवापाड प्रेम केलं, ते कर्ज माझेवर आहे, आपली सेवा करणं, महिलांना सुरक्षा, सन्मान देणं माझं कर्तव्य आहे. राजकारणात हार जीत असतेच, माझ्या पराभवाची जेवढी चर्चा झाली, तेवढी त्यांच्या विजयाची झाली नाही. आता मी नसण्याची किंमत लोकांना कळायला लागलीयं. मंत्री असताना मी खऱ्या पालकत्वाची भूमिका निभावली. आरोग्य केंद्रापासून ते स्मशानभूमी पर्यंत प्रत्येक गावाला न मागता निधी दिला. ते माझं कामच होतं. पण केवळ विकासच नाही तर चांगली संस्कृती रूजवून मतदारसंघाला पूर्वीसारखे दिवस आणायचेत असं पंकजाताई म्हणाल्या.
मंत्री असताना एकेका गावाला पाच पाच कोटीचा निधी दिला, पण कधी श्रेय घेतलं नाही की नारळ फोडायला आले नाही. गुत्तेदार कोण आहे हे ही कधी जाणून घेतले नाही. निधी देताना पक्ष, जात धर्म पाहिला नाही, सर्वाना समान निधी दिला. मात्र मध्यंतरीच्या अडीच तीन वर्षांत राष्ट्रवादीकडे सत्ता होती त्यांनी तर काहीच केलं नाही पण मी आणलेल्या निधीचेच नारळ ते फोडत होते. आता केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आहे, जलजीवन मिशनची कामे ही आम्ही मंजूर करून आणलेली असताना त्याचं श्रेय घेण्यासाठी मात्र ते पुढे येत आहेत असा टोला त्यांनी लगावला.