गांधी कुटुंब हे काँग्रेसचे आधार कार्ड…
मुंबई, दि. 26 ऑगस्ट:
काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष कोण असावा यावर मागील आठवड्यापासून जोरदार चर्चा आहे. गांधी सोडून इतर कोणाला तरी अध्यक्ष करावे अशी मागणीही होत आहे. पण सध्याची राजकीय परिस्थिती पाहता काँग्रेसचा अध्यक्ष होण्यास कोण सक्षम आहे असा प्रश्नशी विचारला जातो. भारतीय जनता पक्ष तर नेहमीच गांधी कुटुंबावर टीका करत असतो. पण शिवसेनेला काय वाटते, काँग्रेसचे नेतृत्व सक्षमपणे कोण करू शकतो…
शिवसेना खासदार संजय राऊत म्हणतात, ‘काँग्रेसचे नेतृत्व गांधी कुटुंबाबाहेरील कोणी करावे अशी मागणी होत असेल तर ती सध्याच्या परिस्थितीत तितकीशी संयुक्तिक वाटत नाही. गांधी कुटुंब हे काँग्रेसचे आधार कार्ड आहे. काँग्रेस पुढे घेऊन जाऊ शकेल असे गांधी कुटुंबाबाहेर सध्या कुणी दिसत नाही. राहुल गांधी यांच्यात नेतृत्वाची क्षमता आहे. त्यांच्या नेतृत्वामुळेच राजस्थान, मध्य प्रदेश व छत्तीसगडमध्ये काँग्रेसला सत्ता मिळाली.’
काँग्रेस आजही एक प्रमुख विरोधी पक्ष आहे, पण सध्या काँग्रेसची ताकद क्षीण झाली हे खरे आहे. त्यांनी अंतर्गत मतभेद संपवायला हवेत. गावागावात कार्यकर्ते असलेला हा पक्ष आहे. उत्तर, पश्चिम भारतापासून ईशान्येपर्यंत पसरलेला पक्ष आहे. केवळ अंतर्गत मतभेद संपवून पुढे जाण्याची गरज या पक्षाला आहे, असे राऊत म्हणाले.
