ईद साजरी करताना देशाला महाराष्ट्रातून समतेचा संदेश देऊ
ईद साजरी करताना देशाला महाराष्ट्रातून समतेचा संदेश देऊ…
येवला, दि. ३ मे :
रमजान ईदच्या निमित्ताने महाराष्ट्रातून देशाला समतेचा संदेश देऊया, एकोप्याने, उत्साहाने ईद साजरी करा असे आवाहन करत मंत्री छगन भुजबळ यांनी सर्व मुस्लिम बांधवांना ईद निमित्त शुभेच्छा दिल्या.

येवला येथील ईदगाह मैदानावर आयोजित नमाज पाठणावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थिती लावली आणि मुस्लिम बांधवांना ईद निमित्ताने शुभेच्छा दिल्या. यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, देशात आपल्याला शांतता राखायची असेल आणि समतेच्या मार्गाने जायचे असेल तर सर्वांनी शिक्षण घेतले पाहिजे. आपल्या मुलांना आणि मुलींना समान शिक्षण दिले पाहिजे. शिक्षण हा आपला अधिकार आहे हे सांगतानाच त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्यासोबत कार्य करणाऱ्या फातिमाबी शेख यांची देखील आठवण काढली…

राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे कायम शिक्षण, विकासासाठी आपल्या सोबत आहेत. काही मंडळी दोन समाजात तेढ निर्माण होईल असे भडकावू भाषण करत आहेत मात्र त्याला बळी न पडता आपण विकासाच्या, रोजगाराच्या, आरोग्याच्या आणि शिक्षणाच्या मुद्द्यावर ठाम रहायला हवे. त्यांनी तेढ निर्माण करण्याचा कितीही प्रयत्न केला तरी या देशाचे संविधान आपले रक्षण करेल असे ठाम मत देखील मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले आहे.
मधला काळ हा कोरोनाचा होता, अडचणींचा होता आता मात्र परिस्थिती सुधारते आहे. सर्वांना उत्तम आरोग्य लाभो, समाजात एकता, समता, बंधुत्वाची भावना वाढीस लागो अशीच प्रार्थना करूया..
