सर्वधर्मसमभाव मानणार्यांनी बंधुभाव टिकवण्यासाठी प्रयत्न करावा
सर्वधर्मसमभाव मानणार्यांनी बंधुभाव टिकवण्यासाठी प्रयत्न करावा.
मुंबई, दि. 28 एप्रिल :
देशातील वातावरण बिघडवण्याचे काम सध्या सुरू आहे. आपापसातील बंधुभाव कमी करण्याचे वक्तव्य करणे योग्य नाही. वातावरण खराब करण्याचा प्रयत्न होत आहे. राज्यातील जनता ज्याप्रकारे सर्वधर्मसमभाव मानते त्यामध्ये हिंदू असो की मुसलमान, ख्रिश्चन असो या सर्वांनी आपापसातील बंधुभाव टिकवण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केले.
राष्ट्रवादी मुंबई विभागीय काँग्रेसच्यावतीने इस्लाम जिमखाना येथे इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पवार बोलत होते.

पवार म्हणाले, कोणाला सभा घ्यायची तर सरकार परवानगी देणार आहे परंतु लोकांना बोलावणे आणि आपापसातील संबंध संपेल अशी वक्तव्य करणे ठीक नाही. मला आनंद आहे की आज इफ्तार पार्टी होत आहे. गेली दोन वर्षे जगात कोरोनाचे सावट आले होते. त्यामुळे उत्सव साजरा करायला मिळाला नाही. लग्न समारंभही साजरे करायला मिळाले नाही. आज कोरोना समस्या कमी झाली आहे.
शांतता निर्माण करण्याचा प्रयत्न आपल्याकडून केला जातोय त्याबद्दल शरद पवार यांनी सर्वांना धन्यवाद दिले.
काही लोक आपल्या दरम्यान असलेला बंधुभाव बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र सर्वांना समान न्याय देण्याचा प्रयत्न सरकार करेल. सर्व लोकांनी शांतता कायम ठेवावी, असे आवाहन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले.
यावेळी खासदार सुप्रियाताई सुळे यांनी देशात आज जे वातावरण आहे, जे चुकीचे घडत आहे त्याला रोखायला हवे. ‘हम सब एक है’ हा संदेश देत सर्वप्रथम आपण सर्व भारतीय आहोत ही भावना प्रत्येकाने बाळगायला हवी असे आवाहन केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार सुप्रियाताई सुळे, खासदार सुनिल तटकरे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, माजी खासदार माजीद मेमन, अल्पसंख्याक राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर विद्रोही, नसिम सिद्दीकी, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, मुंबई कार्याध्यक्ष नरेंद्र राणे, राखी जाधव, राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे, अल्पसंख्याक मुंबई अध्यक्ष सोहेल सुबेदार अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष पठाण आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
