तीन महिन्यात 700 कोटी रुपये खर्चाचे आव्हान !
तीन महिन्यात 700 कोटी रुपये खर्चाचे आव्हान !
नाशिक, दि. 9 जानेवारी:
गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचे संकट असतांनाही जिल्ह्यातील विकास थांबला नाही, थांबणारही नाही. तालुका हा विकासाचा केंद्र बिंदू मानून सर्वांना समसमान निधीचे सुत्र समोर ठेवून वर्ष 2022-23 साठी सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेतंर्गत 414.73 कोटी रूपये, आदिवासी उपयोजनेतंर्गत 293.13 कोटी आणि अनुसूचित जाती उपयोजनेतंर्गत 100 कोटी अशी तिनही योजनांसाठी एकुण 807.86 कोटी रुपये आर्थिक मर्यादा शासनाने कळविलेली आहे.
अशी माहिती अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली.
जिल्हा नियोजन समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात आयोजित करण्यात आली होती. यावेळी बोलतांना पालकमंत्री भुजबळ म्हणाले, वर्ष 2021-22 मध्ये सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेसाठी कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे 25 ऑक्टोबर 2021 पर्यंत फक्त 10 टक्के निधी शासनाने उपलब्ध करुन दिला होता. उर्वरीत निधी 25 ऑक्टोबर 2021 च्या शासन निर्णयान्वये प्राप्त झाला आहे.असे असले तरी मार्च 2022 अखेरपर्यंत पूर्ण खर्च करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच सर्वसाधारण योजनेंतर्गत डिसेंबर 2020 मध्ये रुपये होता व त्याची टक्केवारी 7.90 टक्के एवढी होती. तरीही वर्ष अखेरीस 96.29% निधी खर्च करणेत यश आले. त्या तुलनेत जवळपास तिप्पट खर्च झालेला आहे. खर्च 100% होणेच्या अनुषंगाने आवश्यक ते नियोजन कार्यान्वयीन यंत्रणांनी मार्च 2022 अखेरपर्यंत निधी खर्च करावा.
ज्या तालुक्यांना यापूर्वी कमी निधी वाटप करण्यात आला आहे, त्यांना यावर्षी अधिक देण्यात यावा. त्याचबरोबर सर्व सदस्यांनी मांडलेल्या मागण्या मान्य करून जिल्हा नियोजन व जिल्हा परिषदच्या समन्वयातून निधीचे वाटप करण्यात यावे. आमदारांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषदेअंतर्गत 25 ते 30 टक्के निधी खर्चाची तरतूद असावी. सर्व कामे जिल्हा परिषदेच्या माध्यमातूनच करण्यात यावी. परंतू आमदारांच्या मागण्यांचा प्राधान्याने विचार करण्यात यावा. निधी वाटपात कुणावरही अन्याय होणार नाही त्यादृष्टिने सर्व कार्यान्वयीन यंत्रणांनी काळजी घ्यावी. समन्यायी वाटपाबाबत जिल्हा परिषद 60 टक्के खर्च, जिल्हा प्रशासन 30 टक्के खर्च व नगरपालिका 10 टक्के खर्च अशी विभागणी करण्यात यावी. हे सुत्र सर्वांनुमते एकमुखाने ठरल्याचे पालकमंत्री भुजबळ यांनी सांगितले.
