बिबवेवाडीतील हत्याकांडासारख्या घटना रोखण्यासाठी कायद्याचा धाक हवा
बिबवेवाडीतील हत्याकांडासारख्या घटना रोखण्यासाठी कायद्याचा धाक हवा.
भाजपा आपदा कोषच्या माध्यमातून दोन लाखांची आर्थिक मदत
मुंबई, दि. २५ ऑक्टोबर :
पुण्यातील बिबवेवाडीतील हत्याकांडासारख्या घटना रोखायच्या असतील, तर कायद्याचा धाक निर्माण होण्याची गरज असल्याचे मत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. रविवारी रात्री पाटील यांनी मृत मुलीच्या कुटुंबियांची भेट घेऊन, त्यांचे सांत्वन केले. भाजपा आपदा कोषच्या माध्यमातून दोन लाखाची आर्थिक मदत देण्यासोबतच, कायदेशीर सर्वतोपरी मदत उपलब्ध करुन देण्याचे कुटुंबियांना आश्वस्त केले.
या भेटीवेळी मुलीच्या दिव्यांग भावाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात गुन्हेगारांना जशी शिक्षा होत होती, तशी शिक्षा हत्याकांडातील आरोपीला व्हावी, अशी मागणी केली. यानंतर पाटील यांनी कुटुंबियांना धीर देत गुन्हेगाराला कठोर शिक्षा व्हावी, यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. तसेच, मृत मुलगीच कुटुंबाचा आर्थिक आधार असल्याने, तिच्या हत्येने कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले आहे. त्यामुळे त्यांना आर्थिक मदत देऊ केली.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, “आघाडी सरकारच्या काळात गुन्ह्यांचा दोषसिद्धी दर फक्त ९ टक्के होता. ही सर्वांसाठी चिंतेची बाब होती. पण फडणवीस काळात राज्यात कायद्याचा धाक होता. त्यामुळे दोषसिद्धीदर ५३ टक्के इतका होता. पाच वर्षात गुन्हेगारांमध्ये कायद्याचा धाक होता. तेव्हा अशा घटना रोखण्यासाठी कायद्याचा धाक निर्माण होण्याची गरज आहे. पीडित कुटुंबियांच्या पाठिशी भारतीय जनता पक्ष कायम आहे. कुटुंबियांना न्याय मिळावा यासाठी हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवला जावा. त्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून एक वकील देखील देऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले.
