राज ठाकरेंनी हायकोर्टाच्या आदेशांचा अभ्यास करावा
राज ठाकरेंनी हायकोर्टाच्या आदेशांचा अभ्यास करावा.
मुंबई दि. 7 सप्टेंबर :
कोरोना परिस्थिती नियंत्रणात आल्यावर राज्यातील मुदत संपलेल्या महानगरपालिकांच्या निवडणुका होतील परंतु ज्यांना राज्यसरकार हे जाणूनबुजून करतंय असं वाटतंय त्यांनी विविध हायकोर्टाचे आदेश आलेत त्याचा अभ्यास करावा असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी नाव न घेता राज ठाकरे यांना लगावला आहे.
राज्यात काही महानगरपालिकांच्या मुदत संपल्यावर कोरोनामुळे निवडणूका घेता आल्या नाहीत तिथे प्रशासक नेमण्यात आले आहेत. कोरोना असताना नेमणूकांबाबत हे सरकार जाणूनबुजून कुठेही प्रशासक नेमण्याच्या मनस्थितीत नाही असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.
जेव्हा पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूच्या निवडणूका झाल्या त्यावेळी कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर विविध न्यायालयाने राजकीय पक्षांवर बोट ठेवण्याचे काम केले. मुळात याप्रकरणी निवडणूक आयोगाला जबाबदार धरले पाहिजे होते असेही नवाब मलिक म्हणाले.
सरकारला प्रशासकाच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्था चालल्या पाहिजे यामध्ये रस नाही. लोकशाहीत निवडून आलेल्या लोकांनी कामकाज केले पाहिजे परंतु कोरोनामुळे ही परिस्थिती आल्याचे नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.
