ओबीसी राजकीय आरक्षण कायम ठेवण्यावर सर्वांचे एकमत
ओबीसी राजकीय आरक्षण कायम ठेवण्यावर सर्वांचे एकमत
मुंबई, दि. २७ ऑगस्ट :
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतील ओबीसींच्या आरक्षणाला कुणाचाही विरोध नाही. हे आरक्षण कायम ठेवण्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकेर यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत एकमत झाले असून यासंदर्भात पुढील शुक्रवारी पुन्हा बैठक बोलावण्यात आली आहे अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.
बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, या बैठकीत ओबीसींचे राजकीय आरक्षण कायम ठेवण्यावर सर्वांचे एकमत आहे. त्यासाठी मार्ग कसा काढला जाईल यावर या बैठकीत चर्चा झाली. आता पुढील शुक्रवारी यावर आणखी एक बैठक आयोजित केली आहे. राज्यातील २० जिल्ह्यात आरक्षण कायम राहणारच आहे. राहिलेल्या १६ जिल्ह्यात आरक्षण कमी जास्त होणार आहे. त्या जिल्ह्यात काय करता येईल यासाठी पुढील शुक्रवारी बैठक आहे. सर्वांची भूमिका एकमताची आहे. राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून सगळे एक झाले आहेत. आरक्षणाला कुणाचाही विरोध नाही, असंही पटोले म्हणाले.
सह्याद्री अतिगृहावर झालेल्या या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधिमंडळ पक्षनेते तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह सर्वपक्षीय नेते उपस्थित होते.
