पेगॅसिस वापरून महाराष्ट्रातही हेरगिरी व फोन टॅपिंग झाले का?
पेगॅसिस वापरून महाराष्ट्रातही हेरगिरी व फोन टॅपिंग झाले का?
काँग्रेसच्या सचिन सावंत यांची चौकशी करण्याची मागणी.
मुंबई, दि. 19 जुलै:
पेगॅसिस स्पाॅटवेअरच्या माध्यमातून पत्रकार, विरोधी पक्षाचे नेते, न्यायाधिश यांची हेरगिरी करून फोन टॅपिंग केल्याच्या बातमीने देशातील राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणात केंद्र सरकारने भूमिका स्पष्ट करावी यासाठी संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी गदारोळ झाला. पेगॅसिसबद्दल महाराष्ट्रातही पडसाद उमटले असून फडणवीस यांच्या काळात अशी हेरगिरी केली होती का? याची चौकशी करा, अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.
सावंत पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात या आधीच देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळातील रश्मी शुक्ला यांच्या माध्यमातून अनधिकृत फोन टॅपिंगचे प्रकरण समोर आले आहे. परंतु पेगॅसिस सॉफ्टवेअर वापराच्या बातम्याही येत होत्या, कोणी IPS अधिकारी मंत्रालयात बसून या विषयावर काम करत होता का? DGIPR अधिकारी कोणाच्या परवानगीने इस्त्रायल ला गेले? कोणते प्रशिक्षण त्यांनी घेतले? परत येऊन अहवाल दिला का? पेगॅससशी यांचा संबंध आहे का? निवडणूक काळात प्रचाराचे काम सोडून असे दौरे होणं आश्चर्यकारक व संशयास्पद आहे.
कितींदा कोण अधिकारी इस्त्रायल ला गेले? NSO बरोबर शासकीय मिटींग झाल्या होत्या का? NSO शी कोणता पत्रव्यवहार झाला होता का? हे सर्व समोर आले पाहिजे. या अगोदरही अशा चौकशीची मागणी काँग्रेसचे खासदार दिग्विजयसिंह यांनीही केली होती. देशात पेगॅसिस सॉफ्टवेअर च्या माध्यमातून फोन टॅपिंग व त्यात मोदी सरकारची भूमिका हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. सर्व भाजपाशासित राज्य सरकारांना या कार्यपद्धतीवर काम करण्याचे निर्देश दिले असतील. महाराष्ट्रात फडणवीस सरकारच्या काळात झालेले फोन टॅपिंग यामागे समान मानसिकता व हेतू आहे, असे ही सावंत म्हणाले.
