गणेशोत्सवाला कोकणात जाणाऱ्यांसाठी आणखी विशेष रेल्वे सोडा.
गणेशोत्सवाला कोकणात जाणाऱ्यांसाठी आणखी विशेष रेल्वे सोडा.
भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांची रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांना विनंती.
मुंबई, दि. 11 जुलै :
कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांना सोडण्यात आलेल्या 72 विशेष रेल्वे गाड्या फुल झाल्या असून रेल्वेने अजून अधिकच्या गाड्या सोडाव्यात अशी मागणी भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी पुणे दौऱ्यात रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन केली.
कोकणात गणेशोत्सवाठी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, वसई, विरार या भागातून मोठ्या प्रमाणात चाकरमानी आपल्या कोकणातील गावी जातात. यावर्षी कोकण रेल्वेने 72 अतिरिक्त उत्सव विशेष गाड्या सोडण्याची घोषणा केली आणि बुकिंग सुरु होताच त्यांचे बुकिंग पुर्ण क्षमतेने होऊन बरेचजण अद्याप प्रतिक्षा यादीतच आहेत. दरवर्षीच्या तुलनेत या गाड्या कमी असून 2019 ला कोकण रेल्वेवर 210 फेऱ्या व रेल्वे गाड्यांना 647 अतिरिक्त डबेही जोडले होते.
तर त्यावेळी तिकीटांसाठी ज्यादा बुकिंग साठी 11 टपाल खात्यात, 17 रेल्वे स्थानकात पीआरएस सिस्टम आणि 16 ठिकाणी टाऊन बुकिंग एजन्सी आदी सुविधा 2019 ला खास कोकणवासीयांना उपलब्ध करुन दिल्या होत्या.त्यामुळे याही वर्षी अशा अधिकच्या बुकिंग सुविधा व अजूनच्या काही गाड्या कोकणातील चाकरमान्यांना उपलब्ध करुन देण्याबाबत कोकण रेल्वेला निर्देश द्यावेत ही विनंती आमदार आशिष शेलार यांनी रेल्वे राज्य मंत्र्यांना केली.
