मोदी मंत्रिमंडळात महाराष्ट्रातून राणेंसह 4 जण !
मोदी मंत्रिमंडळात महाराष्ट्रातून नारायण राणेंसह 4 जण !
जावडेकर, रवि शंकर, हर्षवर्धनसह 12 मंत्र्यांना डच्चू.
नवी दिल्ली, दि. 7 जुलै:
केंद्रातील मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला असून तब्बल ४३ मंत्र्यांचा शपथविधी पार पडला आहे. मोदींच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातून नारायण राणे, कपिल पाटील, भागवत कराड, भारती पवार या चौघांना मंत्रिपदाची लॉटरी लागली असून देशभरातून पशुपती कुमार पारस, ज्योतिरादित्य शिंदे, अनुराग सिंह ठाकूर, मंजुपारा महेंद्रभाई, जॉन बर्ला, मुरूगन, नितीश प्रामाणिक यांच्यासह ४३ जणांनी पद व गोपनियतेची शपथ घेतली. राष्ट्रपती भवनात झालेल्या एका छोटेखानी कार्यक्रमात मंत्र्यांचा शपथविधी पार पडला.
हा मंत्रिमंडळ विस्तार करण्याआधी मोदींनी १२ मंत्र्यांचे राजीनामे घेतले. यात आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन, प्रकाश जावडेकर आणि रविशंकर प्रसाद यांचाही समावेश आहे. राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनाही राजीनामा देण्यास सांगितल्याची चर्चा होती पण दानवेंचं मंत्रिपद कायम ठेवण्यात आले आहे.
कोरोना महामारी हाताळण्यात आलेले अपयश, पेट्रोल डिझेल, खाद्यतेल, डाळीचे भाव प्रचंड महाग झाले आहेत. कोरोनाने लोक त्रस्त असल्याने मोदी सरकारवर देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. मंत्री मंडळात मोठ्या प्रमाणात बदल करून सरकारची खराब झालेली प्रतिमा परत मिळवण्यासाठी मोदींनी मंत्री मंडळात बदल केला असल्याचे बोलले जात आहे. महाराष्ट्रातून नारायण राणे यांना मंत्री पद देऊन शिवसेनेला शह देण्याचा प्रयत्न केला असल्याची ही चर्चा आहे.
