मविआ सरकारने लोकशाहीला कुलूप लावले !
मविआ सरकारने लोकशाहीला कुलूप लावले !
मुंबई, दि. 4 जुलै:
महाविकास आघाडी सरकारने आतापर्यंत 7 अधिवेशने घेतली, 36 दिवस कामकाज घेतले. आता हे आठवे अधिवेशन 2 दिवसांचे म्हणजे 8 अधिवेशन 38 दिवसांचे. एक अधिवेशन 5 दिवस सुद्धा नाही.
यातील कोविड काळातील अधिवेशने 4 आणि त्याचे दिवस 14. म्हणजे कोविड काळ नसताना सुद्धा 4 अधिवेशन आणि त्याचे दिवस 24. संसदेची अधिवेशने कोविड काळात 69 दिवसांची झाली. पण कमी कालावधीचे अधिवेशन घेऊन महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्रात लोकशाहीला कुलूप लावले आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुंबई येथे फडणवीसयांनी माध्यमांशी संवाद साधला. ते पुढे म्हणाले की, या अधिवेशनात लक्षवेधी सूचना, प्रश्नोत्तरे, अर्धा तास चर्चा घेण्यात येणार नाहीत.
स्वीकृत झालेल्या प्रश्नांना लेखी उत्तरे देता आली असती. पण, ते सारे प्रश्न व्यपगत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे . एकही संसदीय आयुध वापरता येणार नाही, असा आदेश काढण्यात आला आहे. आरक्षण, शेतकऱ्यांचे प्रश्न, दुधाचे प्रश्न, धान घोटाळा, कोरोनाचा विषय, बारा बलुतेदार यांचे प्रश्न असे कोणतेच प्रश्न मांडायचे नाहीत. भ्रष्टाचार मांडायचा नाही, याची व्यवस्था केली आहे परंतु जे विषय सभागृहात मांडू दिले जाणार नाहीत, ते सभागृहाबाहेर मांडू.
राज्य सरकारने अधिवेशनापासून पळ काढला आहे.
चहापान ही फार छोटीशी परंपरा आहे, ज्यांनी लोकशाहीला कुलूप लावले, त्यांच्याकडून चहापानाची अपेक्षा आम्हाला नाही. सर्व चौकशा या उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे सुरू आहेत.
कुठलाही आरोप झाला की चौकशीची मागणी करणे हे विरोधी पक्षाचे कामच आहे. ओबीसी आरक्षणासाठी केंद्राच्या नाही तर राज्य मागासवर्ग आयोगाच्या डेटाची गरज आहे पण इकोसिस्टीम तेच ते सांगण्यात मग्न आहे. उशीरा का होईना पण आता तेच काम राज्य सरकारने हाती घेतले, हे उशिरा सुचलेले शहाणपण.
मराठा आरक्षणावर न्या. भोसले समितीने अतिशय स्पष्टपणे पुढे काय करायचे हे सांगितले आहे.
ओबीसी आरक्षणाचा प्रश्न देशात नाही तर केवळ महाराष्ट्रापुरता आहे. २०११ मध्ये जेव्हा केंद्र सरकारने सर्वे केला तेव्हा त्यात ८ कोटी चुका असल्याचे निष्पन्न झाले होते. एकट्या महाराष्ट्रात ७० लाखावर चुका आहेत. त्यामुळे तेव्हाच्याच केंद्र सरकारने ही माहिती देऊ नये, असा निर्णय घेतला होता. मराठा आरक्षणासाठी आम्ही केवळ एम्पिरिकल डेटा तयार केला, तेव्हा मराठा समाजाची कुठलीही जनगणना नव्हती, असेही फडणवीस म्हणाले.
