परवानाधारक कुंभार, सुतारांना ५० हजारांचे अनुदान द्यावे !

0
prakash ambedkar

मुंबई, दि. १० जुलै २०२०

राज्यात सध्या लिलाव पद्धतीने मच्छिमारी ठेके दिले जातात ती लिलाव पद्धत बंद करण्यात यावी व थेट मच्छीमारांना ठेके देण्यात यावे, तसेच सुतार, कुंभार या समाजातील लोकांना अनुदान देण्यात यावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीत केली.

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट मातोश्री या निवासस्थानी जाऊन  घेतली. या भेटीदरम्यान अनेक विषयांवर चर्चा झाली. यावेळी त्यांनी पत्रकारांना माहिती दिली. पक्षाचे उपाध्यक्ष धनराज वंजारी हे देखील यावेळी उपस्थित होते.

सध्या राज्यात लिलाव पद्धतीने मच्छीमारी ठेके दिले जात आहेत.मात्र मच्छीमार समाज हा गरीब असल्यामुळे त्यांना लिलाव प्रक्रियेत सहभाग घेता येत नाही. त्यामुळे ही लिलाव पद्धत बंद करून ते सर्व ठेके मच्छीमारांना थेट देण्यात यावे, शिवाय मच्छिमारांच्या सहकारी संस्था आहेत, त्यांना मच्छिमारी करण्याचे अधिकार देण्यात यावे. शासनाने असे केले तर पंचवीस ते तीस लाख मच्छीमार बांधव आहेत त्यांचा आर्थिक प्रश्न सुटेल व त्यांना मदत करण्याची शासनाला गरज पडणार नाही. मच्छिमारी व्यवसायावर ते आपले पोट भरू शकतील व ते स्वतःच्या पायावर उभे राहतील

त्याचबरोबर सुतार, कुंभार यांचे आयुष्य कोरोनामुळे उध्वस्त झाले आहे. त्यांना बँका मदत करायला तयार नाही. कुंभार, सुतार यांच्याकडे परवाने आहेत, त्यांना शासनाने ५० हजार रुपयांचे अनुदान द्यावे, त्यामुळे शासनावर फार-फार तर पंचवीस कोटी रुपयांचा बोजा पडेल. राज्यात सुमारे १७ लाख लोकसंख्या असलेला हा समाज असून शासनाच्या अनुदानामुळे ते त्यांच्या पायावर उभे राहतील. राजगृह हल्ला प्रकरणात योग्य तपास चालू असून पोलीस आपल्या संपर्कात असल्याचेही प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *