हे तर केंद्र सरकारने जनतेला दिलेले रिटर्न गिफ्ट !
हे तर केंद्र सरकारने जनतेला दिलेले रिटर्न गिफ्ट !
मुंबई दि. १ जून :
२०२०-२१ या आर्थिक वर्षांतील भारताचा विकास दर उणे (-) ७.३ टक्के नोंदवला गेला आहे. जनतेने दोनदा निवडून दिल्यावर केंद्र सरकारने जनतेला दिलेले हे रिटर्न गिफ्ट आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
मोदी सरकारचे कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी नियोजन नाही…पेट्रोल-डिझेलचे भाव आवाक्याबाहेर जात आहेत..देशाचा जीडीपी मायनसमध्ये आहे… महागाईचा नुसता भडका उडाला आहे असे सांगतानाच मोदी सरकारने जनतेला या रुपात रिटर्न गिफ्ट दिले आहे असे स्पष्ट केले.
सोमवारी राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार भारतीय अर्थव्यवस्थेने गेल्या ४० वर्षांतील निराशाजनक कामगिरी केली आहे. कोरोनाच्या संकटाने मोठा तडाखा बसलेल्या भारताचा २०२०-२१ या आर्थिक वर्षांतील विकासदर (सकल राष्ट्रीय उत्पादन) उणे (-) ७.३ टक्के नोंदवला गेलाय. चाळीस वर्षांपूर्वी म्हणजे १९७९-८० या वर्षांत आर्थिक विकासदराची उणे ५.२ टक्के घसरण झाली होती. त्यानंतर प्रथमच विकासदर उणे ७.३ टक्क्य़ांवर घसरला आहे.
