फडणवीसांनी मोदींकडे पॅकेजसाठी आग्रह धरावा !
फडणवीसांनी मोदींकडे पॅकेजसाठी आग्रह धरावा !
मुंबई दि. २२ मे :
कोकणातील जनतेला भरपाई देणार आहोतच परंतु महाराष्ट्राला जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी मोदींकडे आग्रह धरला पाहिजे. त्यांनी तसे केले तर ते राज्यातील जनतेसोबत आहेत हे सिद्ध होईल मात्र देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रासोबत नाहीत हे आता सिद्ध होवू लागले आहे अशी जोरदार टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.
विरोधी पक्ष वैफल्यग्रस्त मानसिकतेतून टिका करत आहेत हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. राज्यसरकारची यंत्रणा, प्रशासन अंदाज घेत आहे. पंचनामे करत आहे. पालकमंत्री सातत्याने संपर्कात आहेत. मुख्यमंत्र्यांनी काही भागाचा दौरा केल्यानंतर त्याचा अंदाज पंचनाम्याच्या माध्यमातून येईल. त्यानंतर निश्चितरुपाने एनडीआरएफ, एसडीआरएफच्या स्टँडींग ऑर्डरपेक्षा त्याव्यतिरिक्त अतिरिक्त मदत देण्याची राज्यसरकारची भूमिका असेल असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.
देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रसरकारकडून जास्तीत जास्त मदत मिळण्यासाठी आग्रह धरला पाहिजे ही त्यांची जबाबदारी आहे. मात्र आग्रह धरत नाही आणि राज्यसरकार काय देणार यावर देवेंद्र फडणवीस बोलत आहेत असा टोलाही नवाब मलिक यांनी लगावला.
मोदीजी महाराष्ट्रात आले नाहीत. मात्र गुजरातला एक हजार कोटीचे पॅकेज दिले. आत्ता जनता प्रश्न निर्माण करु लागल्यावर आमच्यावर प्रश्न निर्माण केला जात आहे. आम्ही भरपाई देणारच आहोत पण आधी देवेंद्र फडणवीस यांनी मोदींकडे आग्रह धरला पाहिजे. महाराष्ट्राला जास्त मदत मिळवून दिली पाहिजे असा सल्लाही नवाब मलिक यांनी दिला आहे.
देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रासोबत आहेत की, भाजप नेत्यांना वाचवायला लागले आहेत हे त्यांनी सांगावे असेही नवाब मलिक म्हणाले.
