कोरोना परिस्थिती हाताबाहेर, केंद्राने सर्वपक्षीय बैठक बोलवावी व टास्कफोर्स नेमा !
कोरोना परिस्थिती हाताबाहेर, केंद्राने सर्वपक्षीय बैठक बोलवावी व टास्कफोर्स नेमा !
मुंबई दि. १० मे :
केंद्र सरकारला कोरोना परिस्थिती हाताळता येत नाही याबाबत कुणाच्याही मनात शंका राहिलेली नाही. देशातील सात हायकोर्टाने वेगवेगळे आदेश दिले आहेत. सुप्रीम कोर्टानेही टास्कफोर्स निर्माण करण्याचा निर्णय घेतला. जी कामे केंद्र सरकारला करायची आहेत ती केंद्र सरकारकडून होत नसल्याने न्यायालयाच्या आदेशाने होत आहेत. याचा अर्थ सरकार जबाबदारी पार पाडण्यात कमी पडत आहे. यावर मात करण्यासाठी केंद्र सरकारने तात्काळ सर्वपक्षीय बैठक बोलवावी व टास्कफोर्स निर्माण करावा. आपत्ती व्यवस्थापनसाठी एका नेत्याची निवड करावी त्याच्या माध्यमातून कोरोना परिस्थिती हाताळावी, अशी मागणी मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.
केंद्र सरकारचा समाचार घेताना नवाब मलिक म्हणाले,
साडेचार लाख लोकांना दुसरा डोस देता येत नाही… लस पुरवठा होत नाही…ठिकठिकाणी लोक गर्दी करत आहेत…जबाबदारी स्वीकारल्यानंतर जबाबदारी पार पाडण्याची…नियोजनाची क्षमता नसेल तर जाहिराती करून निर्णय कशाला करता. नवीन लोकांना डोस द्यायला लस उपलब्ध नाहीय. आधी जाहीर करायचं. लोकांमध्ये वेगळं वातावरण निर्माण करायचं आणि लोकांना लसच उपलब्ध नाही हा मोदी सरकारचा ढिसाळ कारभार आहे.
कोरोना परिस्थिती लक्षात घेता एक देश एक निती हा कार्यक्रम ठरवण्याची गरज असताना नुसत्या जाहिरातीच्या माध्यमातून कोरोना संपणार नाही. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये शव दाहिन्यांमध्ये जात नाहीत तर नदीमध्ये अंत्यसंस्कार केले जात आहेत ही परिस्थिती आहे. त्यामुळे संपूर्ण देशात एक नीती बनवली नाही तर कोरोना देशातून हद्दपार होणार नाही.
भाजपशासित उत्तरप्रदेश आणि बिहारमध्ये कोरोना मॅनेजमेंट फक्त जाहिरातीमध्ये आहे. जितके पैसे जाहिरातीवर खर्च करताय तेवढे पैसे कोरोनावर खर्च केला असता तर प्रत्येक गावात लोकांचा मृत्यू झाला नसता असे नवाब मलिक म्हणाले.
