अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्दच, महाराष्ट्र सरकार ठाम!

0
Uday Samanat Minister

मुंबई, दि. ७ जुलै २०२०

अंतिम वर्षाच्या परिक्षेचा गोंधळ काही मिटत नाही. महाराष्ट्र सरकारने या परिक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला असताना विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC)  महाराष्ट्रातील अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्यात येणार नसल्याचे जाहीर केले. त्यानंतर या परीक्षा होणार का असा प्रश्न विद्यार्थी व पालकांना पडला असतानाच राज्याचे उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी केंद्र सरकारला पत्र पाठवत परीक्षा न घेण्याच्या निर्णयावर राज्य सरकार ठाम असल्याचे कळवले आहे.

जवळपास १० ते १२ राज्यांनी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे. राजस्थान, तमिळनाडू, हरियाणा सारख्या इतर राज्यांनीही वेगवेगळी भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे अंतिम वर्षाची परीक्षा घेण्याची युजीसीची मार्गदर्शक नियमावली ही बंधनकारक नाही तसेच देशभर सर्वांसाठी समान नियमावली असावी, असे सामंत यांनी म्हटले आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव अजूनही कमी झालेला नाही अशात युजीसीच्या सूचनेनुसार परीक्षा घ्यायच्याच झाल्यास राज्यातील १० लाख विद्यार्थ्यांना ही परीक्षा द्यावी लागेल. एवढ्या मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी अशा लाखो लोकांचा जीव धोक्यात घालायचा का? हा धोका लक्षात घेऊनच महाराष्ट्राने परीक्षा रद्द केल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील बहुतांश कॉलेजचे रुपांतर क्वारंटाईन सेंटरमध्ये करण्यात आले आहे परंतु या प्रश्नी सुद्धा राजकारण होत असल्याचे दिसत आहे. राज्य सरकार, विद्यार्थी तसेच पालकांसाठी युजीसीचा हा निर्णय धक्कादायक असून ते विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळत आहेत, असेही सामंत म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *