भाजपाच्या शिरीष चौधरीकडे 20 हजार रेमडेसीवीर कसे ?
भाजपाच्या शिरीष चौधरीकडे 20 हजार रेमडेसीवीर आले कसे ?
मुंबई दि. २० एप्रिल :
देशात कोरोनाचे आकडे वाढण्यास सुरुवात झाल्यानंतर रेमडेसिवीर मिळत नाही असे चित्र असताना भाजपाचे जळगाव – अमळनेरचे माजी आमदार व हिरा ग्रुप चालवणारे मालक यांनी नंदुरबार येथील हिरा एक्झिक्युटिव्ह हॉटेलमध्ये हजारो रेमडेसिवीरचा साठा जमा करून ठेवला होता. त्यांनी स्वतः फोटो जाहीर केले आहेत. ब्रुप फार्माच्या ओन्ली फॉर एक्स्पोर्ट हे औषधांवर लिहिलेले असताना ८ एप्रिल व 12 एप्रिलला चौधरी बांधवाकडून रेमडेसिवीर रांगा लावून वाटप करण्यात आले. आमच्या माहितीनुसार २० हजारपेक्षा जास्त रेमडेसिवीर ब्रुक फार्माने आणून ठेवली होती. त्यापैकी ७०० – ८०० इंजेक्शन नंदुरबार, जळगाव आणि धुळे या जिल्हयात काळाबाजाराने वाटप करण्यात आल्याचा आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे.
हिरा ग्रुपचे शिरीष चौधरी यांच्याकडे एफडीएचा परवाना होता का? महाराष्ट्र एफडीएने परवाना दिला होता का? किंवा दमणच्या एफडीएने परवाना दिला होता का? असा सवालही नवाब मलिक यांनी यावेळी केला आहे.
माजी आमदार बेकायदेशीरपणे २० हजाराचा साठा ठेवतोय, विकतोय, वाटप करतोय आणि नंतर तोच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांना घेऊन मंत्री राजेंद्र शिंगणे यांना परवानगी मिळवून द्या यासाठी भेटला. १७ तारखेपर्यंत परवानगी नव्हती. त्या काळात जळगावात धंदा सुरू होता. त्याचवेळी आमचे आमदार अनिल पाटील यांनी मंत्र्यांकडे तक्रार करुन कडक कारवाई करण्याची मागणी केली होती.कालच एफडीएने नंदुरबारच्या जिल्हाधिकारी यांना पत्र देऊन कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत असेही मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले.
तीन दिवसापूर्वी यावर एक प्रश्न निर्माण केल्याचे सांगताना रेमडेसिवीरचा तुटवडा असताना निर्यात कंपन्या आहेत त्यांच्याकडे आमचे अधिकारी संपर्क करत होते. मात्र रेमडेसिवीर आम्हाला द्यायला तयार नाही अडवणूक करत होते असा आरोप होता. ब्रुक फार्माला राज्यसरकारच्या एफडीएने पत्र दिल्यानंतर केंद्रशासित दमणच्या एफडीएने महाराष्ट्राला रेमडेसिवीर देता येणार नाही असे स्पष्ट सांगितले होते. हाच मुद्दा तीन दिवसापूर्वी उपस्थित केला होता. केंद्राकडून अडवणूक होतेय ती थांबली पाहिजे त्यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आणि तुटवडा दूर करण्याचे आश्वासन दिले होते. आम्ही राजकारणासाठी हा विषय आणला नव्हता तर जनहितासाठी समोर आणल्याचे नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.
