सगळे व्यवहार सुरु होत आहेत मग ‘मंदिरेच बंद’ का?
मुंबई, दि. ७ जुलै २०२०
राज्यात पुनःश्च हरिओम म्हणत बंद केलेले सर्व व्यवहार सुरु करण्यास सरकार परवानगी देत आहे. काही अटी, शर्थींचे पालन करुन बाजारपेठा हळूहळू सुरु होत आहेत. राज्यात आणि शहरांत बस वाहतूकही सुरू केली आहे. ८ तारखेपासून हॉटेल आणि उपाहरगृहेही सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्याचधर्तीवर राज्यातील मंदीरे उघडण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी मुंबई भाजपाचे अध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढा यांनी केली आहे.
भारतीय समाज हा देवाधर्माभोवती बांधला गेलेला आहे. कोरोनाच्या संकटकाळात समाजाला भावनिक, धार्मिक आधाराची देखील खरी गरज आहे. त्यामुळे कोरोना संकटकाळात बंद करण्यात आलेली सर्व देवस्थाने सामाजिक आंतराचे (सोशल डिस्टन्सिंग) पालन करत तातडीने उघडण्याची गरज आहे. त्यातून समाजाला मोठा मानसिक आधार मिळेल. त्यामुळे समाजासाठी बंद केलेली सर्व देवस्थाने योग्य ती काळजी घेत तातडीने उघडावीत, अशी मागणी करणारे पत्र लोढा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे.
