दहावी-बारावी परिक्षा पुढे ढकलल्याबद्दल शिक्षणमंत्र्यांचे आभार !
दहावी-बारावी परिक्षा पुढे ढकलल्याबद्दल शिक्षणमंत्र्यांचे आभार !
मुंबई, दि. 12 एप्रिल:
राज्यात निर्माण झालेली कोरोनाची चिंताजनक परिस्थिती पाहता दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परिक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याबद्दल माजी शालेय शिक्षण मंत्री आमदार आशिष शेलार यांनी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचे आभार मानले आहेत.
गेल्या काही दिवसात राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने विद्यार्थी, पालकांमध्ये प्रचंड चिंतेचे व भीतीचे वातावरण होते. पालक वारंवार आम्हा लोकप्रतिनिधींंकडे याबाबत चिंता व्यक्त करीत होते. त्यामुळे नियोजित वेळापत्रकानुसार परिक्षा न घेता तारखा तुर्तास पुढे ढकलण्यात याव्यात. कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आल्यावर योग्य वेळी ऑनलाईन व ऑफलाईन अशा योग्य पद्धतीने परिक्षा घ्याव्यात, अशी मागणी आम्ही भाजपातर्फे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे केली होती. आमची मागणी मान्य करुन तातडीने हा निर्णय घेऊन शिक्षणमंत्र्यांनी पालक व विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. त्याबद्दल त्यांचे आभार मानतो असे आमदार आशिष शेलार यांनी म्हटले आहे.
