‘फी’साठी पालकांना धमकावणाऱ्या शाळांकडे ‘बघा’!
मुंबई, दि. ७ जुलै २०२०
करोना संकटकाळात शाळांनी, विशेषतः इंग्रजी माध्यमाच्या आयसीएसई, सीबीएसई, आयबी बोर्डाच्या शाळांनी फी भरण्यासाठी पालकांकडे तगादा लावला आहे. काही शाळा तर फी भरण्यासाठी पालकांना धमकीवजा इशारा देत आहेत. प्रायव्हेट फायनान्सकडून कर्ज काढा, पण फी भरा असेही धमकावत आहेत. यापुढे जात काही शाळा फी भरली नाही म्हणून विद्यार्थ्यांना शाळेतून काढून टाकत आहेत. हा सर्व प्रकार संतापजनक असून त्याकडे सरकारने तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी मनसे नेते अमित राज ठाकरे यांनी केली आहे.
कोरोनाच्या संकटामुळे हजारो कुटुंबांची आर्थिकस्थिती खालावलेली आहे. या परिस्थितीत शाळांनी समंजसपणा दाखवणे गरजेचे आहे परंतु दुर्दैवाने काही शाळा हा समंजसपणा दाखवत नसून फी भरण्यासाठी पालकांवर दबाव टाकत आहेत. “गेल्या आठवड्यात अशा स्वरूपाच्या तक्रारी घेऊन काही पालक मला भेटूनही गेले म्हणून राज्याच्या मुख्यमंत्र्याना पत्र लिहून “पालकांकडून शाळांनी वाढीव फी घेऊ नये तसेच फी भरण्यासाठी पालकांवर कोणताही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष दबाव टाकला जाऊ नये, यासंदर्भात आपण स्वत: सर्व खासगी शाळांच्या व्यवस्थापनांशी संवाद साधून सध्याच्या संकटकाळात पालकांना दिलासा द्यावा” अशी मागणी केली.
राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने ८ मे २०२० रोजी काढलेल्या आदेशात, शाळांनी फी वाढ करु नये, फी भरण्यासाठी पालकांना पर्याय उपलब्ध करुन द्यावेत, असे आदेश दिले असताना सीबीएससी, आयसीएसई, आयबी या आदेशाला भीक घालत नाहीत. मुंबई उच्च न्यायालयात सरकारच्या आदेशला स्टे देण्यात आलेला आहे. पुढील सुनावणीवेळी राज्य सरकारने कोर्टात भक्कम बाजू मांडून या मुजोर शाळांना वठणीवर आणावे व पालकांना दिलासा द्यावी, अशी अपेक्षा अमित ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.
