कोरोनाची वस्तुनिष्ठ माहिती देतानाच माध्यमांनी जनजागृती करावी.
कोरोनाची वस्तुनिष्ठ माहिती देतानाच माध्यमांनी जनजागृती करावी.
मुंबई, दि. ७ एप्रिल :
राज्यातील कोरोना महामारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्य शासनाने केलेली नियमावली, उपाययोजना यांची वस्तुनिष्ठ माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवितानाच माध्यमांनी जनजागृती करावी. साथीच्या आजाराचा मुकाबला करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन हा लढा यशस्वी करूया असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
विविध माध्यमांमध्ये आरोग्य विषयक पत्रकारीता करणाऱ्या प्रतिनिधींशी मुख्यमंत्र्यांनी दृरदृष्य प्रणालीद्वारे संवाद साधला.
कोरोना विरुद्धची लढाई एकट्या शासनाची नसून त्यात सर्वांचा सहभाग महत्वाचा आहे. कोरोना विरुद्धच्या या लढ्यात उपाययोजना, नियमावलींमध्ये सुधारणा व्हावी यासाठी माध्यमांचा सूचनात्मक सहभाग असावा, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. लसीकरणाच्या पहिल्या आणि दुसऱ्या डोस नंतर किती जणांना पुन्हा कोरोनाची बाधा झाली याविषयी अभ्यास करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी आरोग्य विभागाला केल्या. राज्यातील नागरिकांना प्रबोधनातून दिलासा देतानाच कोरोनाला रोखण्यासाठी एकत्र येवूया, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
माध्यम प्रतिनिधींनी कोरोना नियंत्रणाबाबत, आरोग्य व्यवस्था, औषधांची उपलब्धता, कोरोना चाचण्या, लसीकरण आदी विविध मुद्द्यांवर अनुभव कथन करतानाच काही सूचनाही केल्या. त्या सूचनांचे स्वागत करतानाच हा संवाद यापुढेही कायम ठेवण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री म्हणाले, कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यात सर्वाधिक रुग्णवाढ महाराष्ट्रात होत आहे. ही रुग्णवाढ थांबविण्यासाठी राज्य शासन अनेक उपाय योजना करीत आहे. नियमावली जाहीर केली आहे. लोकांना त्याविषयी सोप्या भाषेत माहिती देताना कोरोना नियंत्रणासाठी अनावश्यक गर्दी टाळणे, मास्क वापरणे, सुरक्षित अंतर ठेवणे या सुचनांचे पालन करणे किती आवश्यक आहे हे समजून सांगायची आवश्यकता आहे. माध्यमांनी जनजागृती करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.
