महाराष्ट्रात कुठे काही झाले की सीबीआय, ईडी, राष्ट्रीय तपास यंत्रणा घुसवतात !

0
20201217_142646

महाराष्ट्रात कुठे काही झाले की सीबीआय, ईडी, राष्ट्रीय तपास यंत्रणा घुसवतात !

मुंबई, दि. 7 एप्रिल:
केंद्रीय तपास यंत्रणांचा महाराष्ट्रातील राजकीय वापर होत असल्याचे आरोप मागील काही घटनांनंतर गेले जात आहेत. काहीही घटले की केंद्रीय यंत्रणेकडेच तपास द्या असा जोर विरोधी पक्ष करत आहे यावर शिवसेनेने सडकून टीका केली.

शिवसेनेचे मुखपत्र सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे की, “महाराष्ट्रातला विरोधी पक्ष रोज उठून ‘‘आज या मंत्र्याला घालवणार, उद्या त्या मंत्र्याची ‘विकेट’ पडणार’’ अशी वक्तव्ये करीत आहे. केंद्रीय तपास यंत्रणा हातात नसत्या तर त्यांना ही अशी बेताल वक्तव्ये करण्याची हिंमत झालीच नसती. महाराष्ट्रात कुठे काही सळसळ झाली तरी सीबीआय, ईडी, राष्ट्रीय तपास यंत्रणेला घुसवायची संधी शोधायची हे राज्यातील विरोधी पक्षाचे आद्य कर्तव्यच झाले आहे.

राज्य बदनाम करण्याचे हे षड्यंत्र आहे. यापूर्वीही महाराष्ट्रात विरोधी पक्षाने सत्ताधाऱयांवर आरोप करून धुरळा उडवला आहे.अनेकदा मंत्री आणि मुख्यमंत्र्यांना जावे लागले आहे, पण त्यांच्यात आजच्या विरोधी पक्षांप्रमाणे द्वेष आणि विखार भरलेला नव्हता.

अनिल देशमुख यांनी राजीनामा दिलाच आहे व ते आपली न्यायालयीन लढाई लढतील, पण देशमुख प्रकरणात ज्या तत्परतेने सीबीआय चौकशीचे आदेश दिले गेले तो सर्व प्रकार अनाकलनीय आहे. स्वतः परमबीरसिंग यांना न्यायालयाने झाप झाप झापले, पण त्याचवेळी जयश्री पाटील यांच्या याचिकेत केलेल्या त्याच गंभीर आरोपांची न्यायालयाने दखल घेतली.

आपल्या देशात कायद्यापेक्षा कोणीच मोठे नाही. महाराष्ट्रात मोगलाई वगैरे अजिबात नाही, पण कायदा आणि राष्ट्रीय तपास यंत्रणेचा गैरवापर राजकीय विरोधकांना कोंडीत पकडण्यासाठी सर्रास केला जातो हे आता नक्की झालेच आहे. महाराष्ट्राचे सरकार अशा प्रकारे खिळखिळे करायचे या डावपेचात अशा संविधानिक संस्था सक्रिय होतात हे चिंताजनक आहे,” असे या अग्रलेखात म्हटले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *