पोलील दलाला गालबोट लावणा-यांची हयगय नाही !
पोलील दलाला गालबोट लावणा-यांची हयगय नाही !
मुंबई, दि. 25 मार्च:
परमबीरसिंह व रश्मी शुक्ला प्रकरणाने राजकीय वातावरण तापले आहे. सरकारही आता दोषींवर कारवाई करण्याच्या तयारीत आहे. पोलीस दलातील काही लोकांनी केलेली चूक गंभीर आहे. ते जे कोणी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. कायदा सुव्यस्थेला तसंच पोलील दलाला गालबोट लावण्याचं काम करत असेल तर त्यांची हयगय करण्याचं काहीच कारण नाही, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे.
अजित पवार पुढे म्हणाले की, ” अधिकाऱ्यांच्या ज्या बदल्या झाल्या आहेत त्या कोणाच्या सांगण्यावरुन झालेल्या नाहीत. त्यासाठी एक कमिटी असते. यासंदर्भात नवाब मलिक यांनी माहिती दिली आहे. ज्या चार पाच अधिकाऱ्यांची नावं घेण्यात आली त्यांची बदलीच झालेली नाही. मुख्यमंत्र्यांनी माझ्यासमोर यासंदर्भात मुख्य सचिवांना सूचना दिल्या आहेत.
“परमबीर सिंह यांच्यासंबंधी सुप्रीम कोर्टाने निकाल दिला असून हायकोर्टातही तारीख आहे. मुख्यमंत्री राज्याचे प्रमुख असल्याने त्यांनी सर्वाची मतं जाणून घेतली. मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांची भूमिकाही जाणून घेतली आहे. मंत्रिमंडळ उद्दव ठाकरेंच्या पाठीशी आहे असा विश्वास सर्वांनी दिला आहे. कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. आपल्याला चौकशीत भेदभाव करण्याची गरज नाही. एटीएसनेही चांगला तपास केला होता. जे सत्य आहे ते राज्यातील जनतेसमोर येईल. अजून कोणची चौकशी करण्याची गरज असेल तर त्यासंदर्भात राज्य सरकार, राज्याचे प्रमुख भूमिका घेतील. भाजपाने केलेल्या आरोपांमध्ये काही तथ्य नाही.
पोलीस दलातील काहीजण सहभागी असल्याची माहिती मिळाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आणि सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. कोणालाही वाचवण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी सरकार करणार नाही, जे दोषी असतील त्यांच्यावर १०० टक्के कारवाई होईल असा विश्वास मला जनतेला द्यायचा आहे,” असंही अजित पवार म्हणाले आहेत.
