कोरोना रोखण्यासंदर्भात अजितदादांचे अधिकाऱ्यांना निर्देश!
बारामती दि. ४ जुलै २०२०
बारामती शहरासह ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे, ही चिंतेची बाब आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी गर्दी टाळली पाहिजे, गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ठोस उपाययोजना राबविण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले.
कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये म्हणून प्रशासनाने दक्ष राहून काम करावे. सार्वजनिक ठिकाणी तसेच अन्यत्र गर्दी होणार नाही आणि सुरक्षित अंतर राखले जाईल याकडे विशेष लक्ष द्यावे. रूग्णाचे जास्तीत जास्त संपर्क शोधणे तसेच तपासणी संख्या वाढवावी. कोविड आणि नॉन कोविड रूग्ण या दोघांनाही वेळेत उपचार मिळणे आवश्यक असल्याने आरोग्य विभागाने याची खबरदारी घेण्याचे तसेच नागरिकांनी मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळण्याचे तसेच विनाकारण घराबाहेर पडू नये असे आवाहनही अजित पवार यांनी यावेळी केले.
कोविडशी लढण्याकरीता आवश्यक असणाऱ्या वैद्यकीय साधन सामुग्रीसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. या आर्थिक वर्षामध्ये ज्या विकासकामांना प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे त्याकरीता मंजूर करण्यात आलेल्या निधीचा वेळेत पूर्णपणे वापर करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्या.
बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या व्हिआयटी हॉलमध्ये ‘कोरोना विषाणू प्रादुर्भाव निर्मुलन’ व ‘विकास कामांचा आढावा बैठक’ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
