कडक निर्बंध लावायला भाग पाडू नका !
कडक निर्बंध लावायला भाग पाडू नका !
मुंबई, दि. 13 मार्च:
लॉकडाऊन लागू करून सगळे बंद करणे आम्हालाही नको आहे. पण मास्क घालणे, सुरक्षित अंतर ठेवणे अशा नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. आम्हाला कडक निर्बंध लावायला भाग पाडू नका, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिला आहे.
राज्यात कोरोना रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत असून देशभरात नव्याने सापडलेल्या करोनाबाधितांमध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक करोना रुग्ण सापडले आहेत. केंद्रीय आरोग्य यंत्रणेसोबतच राज्यातील आरोग्य प्रशासन आणि राज्य सरकारची देखील चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी हॉटेल, उपहारगृह आणि मॉलच्या प्रतिनिधींची ऑनलाईन व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी आवाहन करताना कडक निर्बंधांबाबत इशारा दिला आहे.
राज्यातल्या आजच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात तब्बल १५ हजार ६०२ नवे करोनाबाधित सापडले आहेत, तर ८८ रुग्णांचा मृत्यू झाल्याचं सरकारी आकडेवारीवरून स्पष्ट झालं आहे. त्यामुळे करोना हळूहळू गंभीर होऊ लागल्याचं चित्र राज्यात निर्माण झालं आहे. मात्र, असं असलं, तरी लोकांमध्ये करोनाचं गांभीर्य कमी झाल्याचं देखील दिसून येत असून त्यासंदर्भात प्रशासकीय पातळीवरून वारंवार चिंता व्यक्त केली जात आहे.
