दहावी, बारावीची लेखी परीक्षा ऑफलाईनच
दहावी, बारावीची लेखी परीक्षा ऑफलाईनच..
मुंबई, दि. २३ फेब्रुवारी :
कोरोनामुळे शालेय शिक्षण हे ऑनलाईन घेण्यात येत असल्यामुळे परीक्षा ऑनलाईन घेणार की ऑफलाईन याची चर्चा सुरु होती. परंतु या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षा ऑफलाईनच होणार आहेत. ग्रामीण भागात इंटरनेटची कनेक्टीव्हीटीचा मोठी समस्या असल्याने शिक्षणमंडळ या परीक्षा ऑनलाईन घेण्यास इच्छुक नाही.
शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या, कोविड 19 च्या संदर्भात केंद्र आणि राज्य शासन तसेच आरोग्य विभागाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सुचनांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या अधीन राहून परीक्षा आयोजित करण्यास मान्यता देण्यात येत आहे.
राज्यात सध्या दहावीचे १६ लाख, तर बारावीचे १४ लाख विद्यार्थी असून बोर्डाकडून दहावी-बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते त्यनुसारच १० वीची परीक्षा २९ एप्रिल ते २० मे या कालावधीत होणार आहे. तर बारावीच्या परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे या कालावधीत होणार आहेत.
