कोरोना योद्ध्यांच्या प्रयत्नांना यश; एक लाख रुग्ण कोरोनामुक्त !
मुंबई, दि. ३ जुलै २०२०
कोरोनाने महाराष्ट्रात थैमान घातले असून मुंबई व आसपासच्या परिसरात याची लागण मोठ्या संख्येने झालेली आहे परंतु सरकार व कोरोना योद्धे यांच्या अथक प्रयत्नाने आजपर्यंत एक लाख रुग्ण कोरोनावर मात करुन घरी परले आहेत. यात एकट्या मुंबईतील ५० हजार रुग्ण बरे झालेले आहेत, ही दिलासा देणारी घटना आहे.
राज्यात आजपर्यंत (गुरुवार ) १० लाख चाचण्यांचा टप्पा ओलांडला असून १० लाख २० हजार ३६८ नमुन्यातील १ लाख ८६ हजार ६२६ म्हणजे १८.२९ टक्के अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. राज्यात सध्या ११४ प्रयोग शाळामध्ये या चाचण्या घेतल्या जात आहेत. यात
६४ सरकारी व ५० खाजगी प्रयोगशाळा आहेत. कोरोना चाचण्यांचे हे प्रमाण दर १० लाखांमागे ७७१५ आहे.
जुलैच्या सुरूवातीला एकाच दिवशी ८०१८ रुग्ण बरे होऊन घरी गेले. गुरुवारी सर्वाधिक बरे झालेले रुग्ण मुंबई मंडळतील असून ७०३३ रुग्णांना घरी सोडण्यात आले, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
गुरुवारी सोडण्यात आलेल्या ८०१८ रुग्णांमध्ये मुंबई मंडळात ७०३३ तर पुणे मंडळात ४७७, नाशिक मंडळात ३३२, औरंगाबाद मंडळ ९३, कोल्हापूर मंडळ १२ रुग्ण घरी सोडण्यात आले आहेत. २९ मे रोजी राज्यात एकाच दिवशी ८३८१ रुग्णांना घरी सोडण्यात आले होते. एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण बरे होऊन घरी सोडण्याची ही पहिलीच वेळ होती. त्यानंतर गुरुवारी पुन्हा एकदा तेवढ्याच विक्रमी संख्येने रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सातत्याने बरे होणाऱ्या रुग्णांचा आलेख वाढत असून १५ जून रोजी एकाच दिवशी ५०७१, २४ जून रोजी ४१६१ आणि २५ जून रोजी ३६६१ रुग्ण बरे होऊन घरी गेले. जूनमध्ये एकाच महिन्यात १२ हजार ८९३ एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले.
गेल्या काही महिन्यापासून सातत्याने राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर सुमारे ५१ ते ५३ टक्क्यांच्या आसपास राहीला आहे. राज्यात सध्या उपचार सुरू असलेल्या एकूण (ॲक्टीव्ह) रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
