हा देश फक्त चार लोक चालवतात!
हा देश फक्त चार लोक चालवतात!
नवी दिल्ली, दि. ११ फेब्रुवारी:
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी संसदेत मोदी सरकार व कृषी कायदे यावरून तुफान हल्ला चढवला. कृषी कायद्यात काय चुकीचे आहे यावर विरोधक चर्चाच करीत नसल्याचे मोदी म्हणाले होते. त्याला राहुल गांधी यांनी आज चोख उत्तर देत, हा देश फक्त चार लोक चालवत असल्याचा घणाघात राहुल गांधी यांनी केला.
राहुल गांधी म्हणाले, काही वर्षांपूर्वी ‘हम दो हमारे दो’ घोषणा देण्यात आला होती. करोना ज्याप्रमाणे दुसऱ्या रुपात आला आहे तसंच ही घोषणा आली आहे. हा देश चार लोक चालवतात ‘हम दो और हमारे दो’ असा टोला राहुल गांधी यांनी लगावला. नरेंद्र मोदी हेतूबद्दल बोलले होते, मात्र त्यांचा हेतू फक्त आपल्या मित्रांची मदत करणे एवढाच आहे.
तीन नवीन कृषी कायद्यांतील पहिल्या कायद्यानुसार शेतकऱ्यांना आपला माल बाजार समित्यांच्या बाहेर कुठेही विकता येणार आहे. मग बाजार समित्यांमध्ये जाणार कोण? बाजार समित्या बंद पाडण्याचा सरकारचा डाव आहे.
दुसऱ्या कायद्यात मोठे व्यापारी आपल्या गोदामांमध्ये धान्य कितीही प्रमाणात साठवू शकतात. यामुळे जीवनावश्यक वस्तू कायदाच संपवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
तिसऱ्या कायद्यानुसार शेतकऱ्याला आपल्या मालाची रास्त किंमत घेण्यासाठी उद्योगपतींकडे जावे लागेल. पण त्याला ती मिळणार नाही. तसेच त्याला कोर्टातही जाण्याची मुभा नाही. शेतकऱ्यावर हा मोठा अन्याय आहे, असे राहुल गांधी म्हणाले.
कायदे लागू झाल्यानंतर देशातील शेतकरी, दुकानदार, छोटे व्यापारी यांचे व्यवसाय बंद होतील. फक्त दोन लोक देश चालवणार. अनेक वर्षांनी भारतातील लोक भूकबळीचे शिकार ठरतील. रोजगार मिळणार नाहीत. नोटबंदीपासून मोदींनी याची सुरुवात केली आहे. गरीब, शेतकरी, मजुरांकडून पैसे घेऊन खिशात टाकण्याची योजना होती. नंतर जीएसटी…गब्बर सिंग टॅक्स आणला. नंतर पुन्हा तेच शेतकरी, व्यापारी, दुकानदारांवर आक्रमण केले, असं राहुल गांधी म्हणाले.
