देशाच्या विकासात कामगारांच्या कष्टाचा मोठा वाटा!
देशाच्या विकासात कामगारांच्या कष्टाचा मोठा वाटा!
गुणवंत कामगार पुरस्कार वितरण सोहळा संपन्न.
मुंबई, दि. 10 फेब्रुवारी :
कामगार बंधूंच्या हातामध्ये नवनिर्माणाची प्रचंड मोठी शक्ती असून देशाच्या व पर्यायाने राज्याच्या विकासात कामगारांच्या कष्टाचा मोठा वाटा आहे, असे प्रतिपादन कामगार मंत्री दिलीप वळसे, पाटील यांनी केले. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाद्वारे आयोजित 33 व्या गुणवंत कामगार पुरस्कार वितरण प्रसंगी पाटील बोलत होते.
यावेळी राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू, कामगार विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती विनिता वेद सिंघल, कामगार आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर,विकास आयुक्त पंकज कुमार,कल्याण आयुक्त रविराज इळवे आदी उपस्थित होते.
पुरस्कार मिळालेल्या सर्व कामगार बंधू भगिनींचे स्वागत,अभिनंदन करून कामगार मंत्री वळसे-पाटील म्हणाले, कामगारांनी केलेल्या चांगल्या कामाची नोंद घेऊन, त्यांचा गौरव करण्याचे महत्त्वाचे काम कामगार विभागामार्फत होत आहे. पुरस्कारप्राप्त गुणवंत कामगारांनीही यापुढे भविष्यात उत्तम काम करावे.
प्रगतीकडे झेपावण्याचे काम कामगारांमार्फत होते. कामगार क्षेत्राने आपल्याला उत्तम साहित्यिक, उत्तम विचारवंत व उत्तम खेळाडू दिले आहेत. अशा आपल्या गुणवंत कामगार पुरस्कार मिळालेल्या सर्वांना विशेष कार्य अधिकारी हे पद देण्यात येते. त्याचाही लाभ या सर्वांना मिळेल.
आपल्याकडे 10 टक्के संघटित व 90 टक्के असंघटित कामगार आहेत. असंघटित कामगारांना मदत मिळावी. यासाठी सर्वांनी एकत्र येऊन संघटितपणे काम करणे आवश्यक असल्याचे वळसे- पाटील यांनी सांगितले.
कामगार चळवळीचे जनक नारायण मेघाजी लोखंडे यांच्या पुण्यतिथीच्या औचित्याने हा कार्यक्रम दरवर्षी 9 फेब्रुवारीला घेतला जातो. हुतात्मा बाबू गेनू यांच्या कार्याची महतीही वळसे-पाटील यांनी विषद केली.
कामगारांच्या संदर्भातील अडीअडचणी, त्यांच्या समस्या त्यांना करावयाची मदत यासंदर्भात विभागाने अग्रक्रमाने काम करावे असेही निर्देश वळसे-पाटील यांनी दिले.
कामगारांमुळे व्यवस्था सुव्यवस्थित – राज्यमंत्री बच्चू कडू
कष्टकरी शेतकऱ्यांच्या हाताइतकेच महत्त्व कामगारांच्या हाताला असून त्यांच्यामुळे अनेक व्यवस्था या सुव्यवस्थित राहतात. कामगारांचे हात हे महत्त्वाचे आहेत. त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी कामगार विभाग सक्षमपणे काम करेल. पुरस्कार मिळालेल्या सर्व गुणवंत कामगारांचे अभिनंदन करीत ‘तुम्ही असेच पुढे जा आम्ही तुमच्या सोबत आहोत’ अशा शब्दात त्यांनी पुरस्कारप्राप्त गुणवंतांचा गौरव केला. कामगारांच्या अडीअडचणी सोडविणे, नवीन होणारे कायदे तसेच कामगार कार्यालय सुधारणे, या बाबींवर भर देण्यात येत असल्याचे कडू यांनी सांगितले.
